नवी दिल्ली – राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू झाली असून 150 दिवसांच्या या यात्रेत राहुल देशातील जनतेशी बेरोजगारी, महागाई, शेती आदी विषयांवरसंवाद साधणार आहेत. मात्र तमिळनाडून राहुल गांधी यांना एक वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले.
ते तमिळनाडू या राज्यावर प्रेम करत असल्यामुळे या राज्यातील एका मुलीशी त्यांचा विवाह करून देण्याची तयारी येथील एका महिलेने राहुल या महिलांच्या समूहाशी संवाद साधत असताना दर्शवली आहे.
कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश भारत जोडो यात्रेबाबत ट्वीट करत माहिती देत असतात. त्यांनीच ही माहिती दिली आहे. त्यात त्यांनी नमूद केले की राहुल गांधी मनरेगाच्या कामगारांशी आज चर्चा करत होते. तेव्हा तेथे काम करणाऱ्या एका महिलेने राहुल यांना एका तमिळ मुलीशी त्यांचे लग्न लावून देण्याचा प्रस्ताव दिला. त्यावर राहुल गांधी यांनी काय उत्तर दिले ते मात्र त्यांनी सांगितले नाही.
राहुल यांची भारत जोडो यात्रा 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतून जाणार आहे. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर असा 3750 किमीचा हा प्रवास असणार आहे. यात्रेदरम्यान 22 मोठ्या शहरांमध्ये रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे.