मुंबई – राज्यात पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार, 11,12 आणि 13 सप्टेंबर रोजी विदर्भात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातही 11आणि 12 सप्टेंबर रोजी पाऊसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चमि वायव्य दिशेने म्हणजेच दक्षिण छत्तीसगडच्या दिशेने पुढे सरकणार आहे त्यानंतर त्याची तीव्रता कमी होणार आहे.
मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा तर कोकणात देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. संध्याकाळच्या सुमारास मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर उद्यापासून पुढील ३ दिवस मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आलाय. विदर्भात पुढील 3 दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता तर इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे आज मराठावाड्याकरीता देखील आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील मच्छिमारांना देखील पुढील 5 दिवस अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील 5 दिवसाचा पावसाचा जोर बघता, भारतीय हवामान विभागाकडून इम्पॅक्ट वॉर्निंगचा इशारा देण्यात आला आहे.