मंचर – सततच्या पडणाऱ्या पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील गाव आणि वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते चिखलमय आणि निसरडे झाल्यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना रस्त्यावरुन पायी चालणेही अवघड झाले आहे. ग्रामपंचायतीने मुरूम टाकून रस्ते सुस्थितीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अवसरी खुर्द, घोडेगाव, निरगुडसर, पारगाव, चांडोली, सातगाव पठार आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गावठाण आणि वाड्या-वस्त्यावरील रस्ते चिखलमय झाले आहेत. नागरिकांना चालताना मोठी कसरत करावी लागते. कळंब येथील कानडेवस्ती, शिलमळा, शिरामळा, भैरवनाथमळा आदी वस्त्यांवरील रस्ते पावसामुळे चिखलमय आणि निसरडे झाले आहेत.
निसरड्या रस्त्यावरुन ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी विद्यार्थी तसेच शेतमालाची वाहतूक करताना अडचण येत आहे. घोडनदीला आलेल्या पुरामुळे गावातील स्मशानभूमी, बंधाऱ्यांवरील पूल तसेच वाड्या-वस्त्यांच्या ओढ्यांवरील पूल पाण्याखाली गेले होते.त्यामुळे स्माशनभूमीची दुरवस्था झाली आहे. शेतीपिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. रस्ते चिखलमय झाल्यामुळे रस्त्यांवर मुरुम टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.