नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्याने काश्मीरमध्ये सध्या अशांतता आहे. अशातच राजकीय नेते वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. आता यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे. भारत जेव्हा शंभरावा स्वातंत्र्यदिन साजरा करत असे. तेव्हा काश्मीर भारताचा भाग नसेल, असे वक्तव्य तामिळनाडूमधील मारुमलारची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएमके) पक्षाचे सर्वेसर्वा वायको यांनी केले आहे. ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.
वायको म्हणाले कि, भारत शंभरावा स्वातंत्र्यदिन साजरा करताना काश्मीर भारताचा भाग नसेल. भाजपाने काश्मीरला खड्ड्यात ढकलले आहे. याआधीही मी काश्मीरबद्दल माझे मत व्यक्त केले आहे. मी काश्मीर प्रकरणावरुन काँग्रेसवर ३० टक्के तर भाजपावर ७० टक्के टिका केली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, कलम ३७० हटवण्याचा संकल्प राज्यसभेत सादर करण्यात आला होता. त्यावेळीही वायको यांनी याचा विरोध करत हा अत्यंत दुःखी दिवस असल्याचे म्हटले होते. काश्मिरी लोकांना दिलेले वचन तोडण्यात आल्याचे ते म्हणाले होते.