फुगेवाडीतील नागरिकांकडून झाडांना पाणी
पिंपळे निलख – दापोडी भागात उड्डाणपुलावर महापालिका प्रशासनाने लावलेली झाडे उन्हामुळे कोमेजू लागली आहेत. याकडे महापालिका उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने दापोडी उड्डाणपुलावर लावलेल्या झाडांना सलाइन लावून पाणी देण्याची वेळ वृक्षमित्रांवर आली आहे. उद्यान विभागाने झाडांची काळजी घ्यावी, अशी मागणी नगारिकांकडून होत आहे.
कुंड्यांमध्ये लावलेली झाडे सुकू नयेत यासाठी फुगेवाडीमधून दक्ष नागरिक यलापा वालदोर ट्रस्टी, रायझिंग फाउंडेशन, सोपान मुळे, ज्येष्ठ नागरिक सुभाष डिग्गीकर, स्वप्नील शेवाळे आणि अक्षय अवसरमल यांनी झाडांना पाणी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
दापोडी येथील उड्डाणपुलावर ज्या कुंड्या आणि झाडे बसविली आहेत. त्यांना दोन ते तीन दिवस झाले तरी पाणी पुरवठा नाही म्हणून झाडे अक्षरशः वाळून जात आहेत. जर झाडांची निगा राखणे कठीण असेल तर या कुंड्या येथून काढून टाकाव्यात, अशी मागणी महापालिकेला करण्यात आली आहे. गेले दोन ते दिवसांपासून उष्णता व सूर्यप्रकाश तीव्र होत असून, हवामान विभागाने उष्ण लाटेची शक्यता वर्तविली आहे.
अशातच महापालिका प्रशासनाने विविध ठिकाणी रस्त्याच्या मधोमध स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या आकाराच्या कुंड्यांमध्ये विविध झाडे लावली परंतु फक्त झाडे लावली म्हणजे सर्व काही होत असते असे नाही तर त्या झाडांना जगविण्यासाठी त्यांची निगा व वेळोवेळी पाणी देण्याची गरज असते. हे प्रशासन विसरले की काय असे दिसून येत आहे. तीव्र उन्हामुळे सुकत असलेल्या झाडांना फुगेवाडी येथील नागरिकांनी पाणी दिले. त्यांच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.