औंध –औंध डीपी रोड परिसरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठ्यातील असमतोल, अवेळी पुरवठा व काही ठिकाणी इलेक्ट्रिक मोटारींचा गैरवापर केल्यामुळे पाणी टंचाईची समस्या वाढली आहे. डीपी रोड परिसरातील दर्शन पार्क सोसायटी, स्नेहांकित सोसायटी तसेच परिसरातील इतर मोठ्या सोसायट्यांमध्ये तीव्र स्वरूपाची पाणीटंचाईने आहे. याठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याची समस्या कायम असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
औंध गावठाणात पाणीपुरवठा सुरळीत असून औंध डिपी रोड परिसरात कमी दाबामुळे पाणी समस्या जाणवत आहे. तसेच विधाते वस्ती, डीपी रस्ता परिसरात पहाटे तीनच्या सुमारास पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेषत: या परिसरात बहुसंख्य नागरिक हे कामगार असून दिवसभर कामाला जाणारी ही मंडळी एवढ्या पहाटे उठणे शक्य नसल्याने पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरीक करीत आहेत. तरी यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. हीच परिस्थिती सोमेश्वरवाडीत असल्याने पहाटे पाच नंतर पाणीपुरवठा करावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. पाषाण गावठाणात मागील दोन आठवड्यांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. तर सूसरस्ता परिसरातील वरदायिनी, प्राइम, हिलसाइड सोसायटीसह इतर काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी असल्याने पाणी समस्या जाणवत आहे.पंचवटीत काही वेळेस व्यवस्थित पाणी पुरवठा होतो. परंतु, अधूनमधून इथेही पाणी समस्या जाणवते त्यामुळे टॅंकरचे पाणी रहिवाशांना घ्यावे लागते.
एकीकडे नागरिकांना समान पाणीपुरवठा योजनेची स्वप्ने दाखविण्यात येत आहेत तर दुसरीकडे दररोज एक ते दोन तास पाणी मिळणे ही अवघड झाले आहे. गेली अनेक वर्ष प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेते यांच्याकडे वारंवार पाण्यासाठी हेलपाटे घालून देखील पाणीटंचाईचा प्रश्न सुटलेला नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत असल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पाणीप्रश्न गाजणार हे नक्की.