खटाव (प्रतिनिधी) – खटाव परिसरात मागील आठवड्यात मान्सूनची चाहूल देत सलग काही दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. बळीराजानेही आपली पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून बहुतांश शेतकरीवर्गाने पेरण्या उरकून घेतल्या. मातीमध्ये बीज पडल्यानंतर ते अंकुरायला लागले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
वास्तविक खरीपाची पिके बहुधा पावसावरच अवलंबून असतात. ठराविक वेळेत पाऊस पडावाच लागतो. पाऊस पडलाच नाही तर बळीराजावर दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपते. सध्या करोनामुळे त्रस्त शेतकऱ्यास दुबार पेरणीचे संकट सोसणार नाही. “बुडत्याचा पाय अधिकच खोलात’ जाऊ शकतो. पावसाने ओढ दिल्याने पेरणी उरकून घेतलेला शेतकरी व बी रूजून आलेला शेतकरी चातकाप्रमाणे पावसाच्या प्रतीक्षा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पिकाला पाणीपुरवठा करण्याची सोय आहे, तो शेतकरी सद्यस्थितीत सिंचनाच्या तुषार, ठिबक, प्रवाही सिंचन अशा विविध प्रकारच्या सिंचनाचा वापर करून जमिनीत पेरलेलं पिक कसेबसे जगवण्याचे प्रयत्न करीत आहे. ऐन पावसाळ्यात सिंचन करावे लागत आहे. त्यामुळे जमिनीतील उपलब्ध पाणीसाठा पुरणार तरी किती दिवस, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरडवाहू शेतकरी मात्र अधिक चिंतातूर दिसत आहे. कारण कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसावरच अवलंबून असल्याने हा वर्ग अधिक काळजीत आहे.
सद्यस्थितीत पाऊस फार आवश्यक आहे. अन्यथा करोनामुळे संकटात असलेला शेतकरी अधिकच अडचणीत येणार आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवून त्यांच्या हिताचे निर्णय घेऊन जगाच्या पोशिंद्याला नव्याने उभारी द्यावी, असे मत खटावचे प्रगतीशील शेतकरी नानासाहेब आबाजी जाधव यांनी व्यक्त केले