पुणे – दुष्काळी स्थितीमुळे खरीपाच्या उत्पादनावर परिणाम होण्यासोबत रब्बीचे घटलेले क्षेत्र आणि चाऱ्याची उपलब्धता हा देखील चिंतेचा विषय असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. दरम्यान, जलयुक्त शिवारच्या आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत असून वनराई बंधाऱ्यासारखे जलसंधारणाचे उपक्रमही राबविण्यात येत असल्याचे राव यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत केंद्रीय समितीसमोर विभागीय आयुक्त यांनी सादरीकरण केले. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ३५ कोटी ३७ लाख तर सोलापूर जिल्ह्यात ८६ कोटी ६८ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती देखील राव यांनी दिली. उजनी धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी असल्याने सोलापूर जिल्ह्यावर याचा परिणाम होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यांनी दुष्काळी स्थितीमुळे शेतीवर झालेल्या परिणामांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. पावसाळ्यात कोरड्या दिवसांची संख्या अधिक असल्याने दुष्काळग्रस्त भागात ज्वारी, बाजरी, मूग, उडीद आणि सूर्यफुलाचे उत्पादन घटले आहे.
दुष्काळाविषयी ठळक मुद्दे
– राज्याच्या १० जिल्ह्यात २४ तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ
– सात जिल्ह्यांतील १६ तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ
– रब्बीच्या ५३.९७ लाख हेक्टरपैकी ३६.३७ लाख हेक्टर क्षेत्रावरच पेरणी
– दुष्काळी भागातील २४.७६ लाख हेक्टर क्षेत्र बाधित
“४० तालुक्यांतील ५९ लाख ६४ हजार जनावरांसाठी पुढील ६ महिन्यांसाठी ३९६ लाख मे.टन हिरवा चारा व ३६.१८ लाख मे.टन चाऱ्याची आवश्यकता आहे. सोबतच पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.” – हेमंत वसेकर, पशुसंवर्धन आयुक्त