सासवड : पुरंदरला खुप वर्षांनी टंचाईस्थिती निर्माण झाली आहे. यात राजकारण कोणीही करु नये. सर्वांनी मिळून लढा देऊ. पुरंदर किंवा जानाई उपसा सिंचन योजनेचे पाणी टंचाईस्थिती म्हणून मोफत देण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्याला माझे पत्र देऊन शासनाकडे पाठपुरावा करुन मोफत पाणी सोडण्याचे काम युद्ध पातळीवर व्हावे. त्याचबरोबर पुरंदरमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठीचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवावा, असे आमदार संजय जगताप सांगितले.
सासवड येथे पुरंदर तालुका टंचाई आढावा बैठकीचे आयोजन आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात केले होते. यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी तहसीलदार विक्रम राजपुत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार-गावडे, सासवडचे पालीका मुख्याधिकारी निखील मोरे, जेजुरीचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, पंचायत समितीचे पाणीपुरवठा उप अभियंता सचिन घुबे, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे अभियंता महेश कानेटकर, जिल्हा बॅंकेचे महेंद्र खैरे, सुदाम इंगळे, प्रदीप पोमण, सुनिता कोलते, विठ्ठल मोकाशी, संजय चव्हाण, हेमंतकुमार माहूरकर, राहुल गिरमे, योगेश फडतरे, संदीप फडतरे, मनिषा नाझीरकर, काका पिसाळ आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले की, गावच्या पाणी योजनांची दुरुस्ती, विहीरींचा गाळ काढणे, खोलीकरण, विंधनविहीर दुरुस्ती, जलसंधारण कामांची दुरुस्ती, खोलीकरण आदींचे प्रस्ताव दिले असतील, पाठपुरावा सुरू ठेवावा. ज्यांनी प्रस्ताव दिला नसेल त्यांनी टंचीास्थिती लक्षात घेऊन ते त्वरीत द्यावेत. पाणीपुरवठा योजनेचे काम जलजीवन मिशनमधून सुरू असून संबंधित ठेकेदार व यंत्रणा गावाला, ग्रामपंचायतीला विचारात घेत नसल्याची प्रामुख्याने तक्रार झाली.
टॅंकर मागणीचे प्रस्ताव देण्यात ग्रामपंचायती गती घेत नाहीत, पाणीपुरवठ्याच्या विहिरी खोलीकरणात काही गावांत शेजारील विहिरीवाले अडथळे आणतात, टंचाई नियोजन झाल्याप्रमाणे विंधनविहिरी किंवा विहिरी खोलीकरण, पाण्याचे पुनःर्भरण या कामांना अपेक्षित गती नाही. पुरंदर उपसा जलसिंचन योजना व जानाई जलसिंचन योजनेचे पाणी दोन महिन्यांपूर्वी सोडले असते तर ही टंचाईची वेळ आता पूर्व भागात आली नसती, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या
सोनोरी, वाल्हे गावच्या पाच वाड्या, रिसे गाव व वस्त्या येथे तीन टॅंकरच्या खेपा सुरु आहेत. पिसे, राजुरी, वागदरवाडी येथील टॅंकर मागणीचे प्रस्ताव मंजूरीच्या टप्प्यात आहेत. शिवाय दौंडजची मागणी आली, टॅंकर मागणी प्रस्ताव येईल. तरीही अनेक गावांचे टंचाईस्थिती लक्षात घेता टॅंकर नियोजन तयार ठेवले आहे. पाऊस लांबल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई व्यापक होऊ लागली आहे.
– डॉ. अमिता पवार-गावडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती
तालुक्यात धरणे व जलाशयातील गाळ काढण्याची आठ ठिकाणी कामे सुरु आहेत. आणखी प्रस्ताव द्यावेत. विंधन विहिरींच्या दुरुस्तीला विलंब करु नये. उपसा जलसिंचन योजनेच्या विलंबाकडे आपण प्रशासन म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लक्ष देणार आहे. टॅंकर प्रस्तावात पशुधनही गृहीत धरुन लोकसंख्येनिहाय नियोजन करा.
– विक्रम राजपूत, तहसीलदार
त्यास जुलै महिना उजाडू देऊ नका
टंचाई आराखड्याची बैठकी ही जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच घेणे अपेक्षित होते आता टंचाई आराखडा करुन त्याच्या अंमलबजावणीला जुलै महिना उजाडू देऊ नये. काही कामे अगोदरच सुरू झाली पाहिजेत, असे माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, नीरा बाजार समितीचे संचालक महादेव टिळेकर यांनी सांगितले.