वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तरीही बहुविध लेखन प्रकारात लेखनाचा व्यासंग असणाऱ्या डॉ. तारा वनारसे (तारा रिचर्डस) यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 12 मे 1930 रोजी पुणे येथे झाला. त्यांनी नाटक, कविता, कथा या प्रकारात साहित्य सेवा केली होती. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते.
तारा वनारसे यांच्या आई या महर्षी कर्वे यांच्या आश्रमात वाढलेल्या बालविधवा होत्या. त्या आश्रमात हॉस्टेलवर देखरेख करीत असत. पुढे ताराबाईंच्या आईने वनारसे यांच्याशी पुनर्विवाह केला. त्यांचे शालेय शिक्षण पुणे येथे झाले. त्यानंतर मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. ब्रिटनमधील शिक्षण संपल्यावर वर्ष 1970 ते वर्ष 1975 या काळात त्यांनी पुण्यात प्रॅक्टिस केली. मात्र त्यानंतर त्या इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्या.
इंग्लंडमध्ये असतानाच डॉ. बेनोडिक्ट रिचर्डस (शल्यविशारद) यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना मिरांडा ही मुलगी आहे.ताराबाईंच्या सासूबाई ओलिव्हिए या इंग्लंडमधील सुसंस्कृत कुटुंबातल्या होत्या. डॉ. बेनोडिक्ट यांचे वर्ष 1995 मध्ये निधन झाले.
डॉ. तारा प्रसूतीतज्ज्ञ होत्या. त्या जरी वैद्यकीय व्यवसाय व अभ्यास करीत होत्या तरी त्यांचा साहित्याकडे ओढा होताच. त्यांचे लेखनही सुरू होते. त्यांनी लेखन सुरू केले त्यावेळी नवकथा बहारात येऊ लागल्या होत्या. 1960 नंतर मराठी कथेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात पुरुष लेखकांबरोबर लेखिकांचा मोठा सहभाग आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. तारा वनारसे, कमल देसाई, विजया राजाध्यक्ष, सरिता पदकी, वसुधा पाटील अशी नावे आघाडीवर होती.
ताराबाईंच्या लेखनात कादंबरी किंवा नाटक हे प्रामुख्याने नायिका प्रधान होते. इंग्लंडमध्ये असताना तेथील सामाजिक क्षेत्रात मराठी साहित्य व महाराष्ट्रीय सांस्कृतिक चळवळीमधे सक्रिय होत्या. लंडन येथील महाराष्ट्र मंडळासाठी त्यांनी बरेच काम केले आहे. त्यांच्या कविता नवकाव्य प्रकारातील होत्या.
वर्ष 1955 मध्ये त्यांचे नायिकेच्या मनातील आंदोलने दर्शविणारे “कक्षा’ हे नाटक प्रसिद्ध झाले, त्यावेळी त्यांचे वय 25 वर्षे होते. या नाटकाचा पहिला प्रयोगही वर्ष 1955 मध्ये म्हणजे ताराबाईंच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाला. नाटकाचा पहिला प्रयोग ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक आत्माराम भेंडे यांच्या “कलाकार’ नाट्यसंस्थेने केला.त्यात स्वतः आत्माराम भेंडे (दिग्दर्शक), आशा भेंडे, कुसुम कुलकर्णी आणि सुधाकर कुलकर्णी यांनी भूमिका केल्या होत्या.
प्रेक्षकांना हे नाटक खूपच आवडले होते.रामायणातल्या शूर्पणखेला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी “श्यामिनी’ ही कादंबरी लिहिली आहे. तिच्यातली प्रकरणे लक्ष्मण, ऊर्मिला, शंबुक, रावण आणि बिभीषण यांच्या दृष्टिकोनातून लिहिली आहेत. “सूर’ ही कादंबरी जुळ्या मुलांच्या मनातील व्यथा या विषयावर होती.
त्यांचे वयाच्या 80 व्या वर्षी इंग्लंडमधील हेमेल हेम्पस्टेड येथे 12 मे 2010 रोजी निधन झाले.