नवी दिल्ली – करोनाच्या साथीला हाताळण्यासाठी भारताला धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी या दोन्हीमध्ये समतोल साधावा लागेल. त्याचप्रमाणे करोनाचा संसर्ग ग्रामपातळीवर पोहोचू न देण्याचे सर्वात मोठे आव्हान देशासमोर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले.
करोनाच्या साथीविरोधातील लढ्यादरम्यान राज्यांनी केलेल्या कामगिरीचे पंतप्रधानांनी कौतुक केले. करोनाच्या साथीपासून स्वतःचा बचाव करण्यात भारत यशस्वी झाल्याचे सर्व जग मानत आहे. मात्र यापुढील मार्गक्रमण करण्यासाठी समतोल धोरण स्वीकारावे लागणार आहे. राज्यांनी केलेल्या सूचनांच्या आधारे पुढील धोरणाची निश्चिती केली जाणार असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
जेंव्हा जेंव्हा सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळले गेले नाहीत किंवा लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीमध्ये शिथिलता आली, तेंव्हा तेंव्हा समस्या उद्भवली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान लोकांनी ते जिथे आहेत, तिथेच थांबायला हवे, यासाठी सर्वाधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र अशा कालावधीदरम्यान लोकांना आपापल्या घरी परत जायचे असते. त्यामुळे निर्णयात बदल करावा लागतो, असे पंतप्रधान म्हणाले.
देशात सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव ग्रामपातळीवर पसरू नये, हे सर्वात मोठे आव्हान आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.