मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे शिवसेनेची बरीच नाचक्की झाली आहे. तर अतिरिक्त उमेदवार निवडून आल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या गोटात उत्साह संचारला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच जोरावर विधान परिषदेलाही अतिरिक्त उमेदवार दिला आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतच संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळते आहे.
विधान परिषदेत दोन आमदार निवडून येण्यासाठी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ आहेच. शिवाय काही अपक्षही त्यांच्यासोबत आहेत. मात्र तरीही शिवसेना गाफील राहण्यास तयार नाही. आपले दोन्ही उमेदवार जिंकून यावे यासाठी शिवसेनेकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सर्व आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच पूर्ण लक्ष घातले असून पुढच्या तासांत अनेक नकारात्मक राजकीय घडामोडी घडू शकतात. त्यामुळे आमदारांनी गाफील राहू नये. हॉटेलमध्ये नातेवाईक आणि मित्रांपासून दूर राहावे अशा सूचना त्यांनी दिल्याचे समजते. आपल्याला विधान परिषद निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
एकीकडे शिवसेना आमदारांची बैठक झाली असताना तिकडे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत कॉंगेस नेत्यांची बैठक गुपचूप बैठक झाली. अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी गुप्त बैठक पार पडली. यासाठी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यानंतर दोघंही एकाच गाडीत बाहेर पडले.
कोणालाही याची माहिती देण्यात आली नाही वा कशावर चर्चा झाली याचीही माहिती समोर आली नाही. याचाच अर्थ आघाडीतील दोन पक्ष वेगळ्या स्ट्रॅटेजीवर काम करत आहेत का, असा सूर काही जणांनी लावला असून मुख्यमंत्री ठाकरे या गुपचूप प्रकारामुळे नाराज असल्याचीही बातमी आहे. दरम्यान, आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही केला आहे.
एका उमेदवाराच्या विजयासाठी 27 मते आवश्यक आहेत. मात्र कॉंग्रेसने त्यांच्याकडे संख्या नसतानाही दोन उमेदवार दिले आहेत. मग उरलेली मते त्यांनी जमवली कशी असा प्रश्न आहे व त्यामुळेच शिवसेनाही संभ्रमात असल्याचे मानले जाते आहे.