मावळातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट
करोना महामारीतून सावरताच अवकाळीने झोडपले
पवनानगर – वातावरणातील बदलांमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. मावळ तालुक्यात या वर्षी परतीचा पाऊस नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू होता. यामुळे मावळ तालुक्यातील भात पिकांचे कापणी वेळी मोठे नुकसान झाले.
मार्च महिन्यापासून करोना या आसमानी संकटातून शेतकरी सावरत असताना परतीच्या पावसाने तो हतबल झाला होता. ऐन काढणीच्या हंगामात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला तर यातून पुन्हा उभारी घेऊन बळीराजा कामाला लागला. शेतीची मशागत करून डोंगरी भागात थंडीच्या हंगामातील हरभरा, मसुरी, वाटाना या कडधान्यांची पेरणी केली. तर बागायत शेतीमध्ये गहू, टॉमेटो, वांगी, मिरची, कोबी, कोथिंबीर, कांदा आदी पिकांची लागवड केली आहे.
मात्र थंडीच्या काळात अवेळी बरसणाऱ्या पावसाने कडधान्यांची पिके नष्ट होण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. तर कांदा गहू व इतर पिकांच्या दुबार लागवडीचे संकट पावसामुळे ओढावले आहे. तर काही ठिकाणी अजूनही पेरण्या रखडल्या आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. तर पुन्हा हे संकट उभे ठाखले आहे. डिसेंबर महिन्यात राज्यात थंडीचा कडाका असतो. यावेळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे.