नागपूर – समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजाजवळ 1 जुलैला मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातानंतर समृद्धी मार्गावरचा प्रवास अनेक प्रवाशांसाठी धडकी भरवणारा ठरत आहे. त्यामुळेच अमरावतीवरून पुणे, नाशिक,
छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या खासगी बसेसचे तिकीट आरक्षित करण्यापूर्वीच बहुतांश प्रवासी बस कोणत्या मार्गाने जाणार, हे विचारण्यासोबत समृद्धी मार्गाने जाणाऱ्या बसचे तिकीट नकोच, असे म्हणून समृद्धीवरून प्रवास नाकारत आहेत. त्यामुळेच अमरावती, नागपुरातून पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या खासगी बसच्या समृद्धीवरून प्रवासात मागील महिनाभरात तब्बल 60 ते 65 टक्के घट आली आहे.
अमरावतीहून रोज पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसाठी सुमारे 30 तर नागपूरवरून 30 ते 35 खासगी बस अमरावतीत येतात आणि अमरावतीवरून प्रवासी घेऊन पुढे जातात. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर 1 जुलैपूर्वी या 65 ते 70 बसेसपैकी सुमारे 50 हून अधिक बसेस समृद्धीनेच जात होत्या. मात्र, 1 जुलैला मध्यरात्री अपघात झाला आणि प्रवाशांमध्ये समृद्धीवरील असुरक्षित प्रवासाची प्रचंड भीती निर्माण झाली असून आता केवळ 10 ते 15 बस धावत आहेत.
10 ते 15 बस समृद्धीवरून
आता केवळ नागपूरवरून थेट छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे जाणाऱ्या तसेच अमरावतीवरून थेट पुणे, नाशिक जाणाऱ्या क्वचित अशा 10 ते 15 बस वगळता उर्वरित सर्व बसेस समृद्धीवरून न जाता मेहकर किंवा अकोला, खामगावमार्गे जात आहेत, अशी माहिती खासगी बस वाहतूकदार तसेच प्रवाशांकडूनच समोर आली आहे.
आत्तापर्यंत 95 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणारा समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा मार्ग ठरत आहे. जानेवारी 2023 ते जून 2023 पर्यंत या महामार्गावर एकूण 449 अपघातात 95 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी दिली आहे.
सिंदखेडराजाजवळ अपघात झाल्यानंतर समृद्धीवर जाणाऱ्या खासगी बसमधील सुरक्षिततेच्या उपकरणांची तपासणी करण्यासोबतच बसचालकाची ब्रीद ऍनालायझरद्वारे तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र पथके नेमली आहेत. नागपूर व कारंजा लाड इंटरचेंजवर आमचे पथक तैनात राहते. तसेच इंटरचेंजच्या अलीकडे असलेल्या काही हॉटेल, ढाब्यांपासून पाचशे मीटर समोर चालकांची रात्री 9 ते 12 या वेळेत ब्रीद ऍनलायझरद्वारे तपासणी सुरू आहे.
-राजाभाऊ गित्ते, आरटीओ अमरावती तथा नोडल अधिकारी, समृद्धी महामार्ग.
सिंदखेडराजाच्या अपघातानंतर समृद्धीवर केवळ नागपूरवरून थेट पुणे, नाशिक जाणाऱ्या मोजक्या 10 ते 15 बसेस धावत आहेत. अमरावतीवरून जाणाऱ्या बस तर क्वचितच समृद्धीवरून जातात. पूर्वी ही संख्या दरदिवशी 50 हून अधिक होती. या अपघातानंतर 65 ते 70 टक्के घट झाली आहे.
-मेराज खान पठाण, अध्यक्ष, अमरावती जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन.