मुंबई – शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढ देण्यात आली असल्याचे मुंडे म्हणाले. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज तीन ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरुन घ्यावा असे आवाहन मुंडेंनी केले आहे.
पीक विमा योजनेतून केवळ एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येतो. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. पण गेल्या अनेक दिवसांपासून पिक विमा उतरवताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. गेल्या काही दिवसांपासून पिक विमा भरण्यासाठी सरकारची वेबसाईट योग्यप्रकारे चालत नसल्यानं शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेक जिल्ह्यातील शेतकरी सीएससी सेंटरवर पिक विमा अर्ज भरण्यासाठी चकरा मारत होते, पण ऑनलाईन फॉर्म भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तर काही जणांनी तर सीएससी सेंटरवरच थांबणे पसंत केले होते.
राज्याची विनंती केंद्राकडून मान्य
पीक विमा भरण्यासाठीची वेबसाइट सतत हॅंग होत असल्याने शेतकऱ्यांना दिवस-दिवस सीएससी सेंटरवर बसून राहावे लागत होते. अशातच पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली शेवटची तारीख जवळ येत चालली होती. याच पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री मुंडे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाइट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. राज्याची हीच विनंती मान्य करत आता पिक विमा भरण्यासाठी केंद्राकडून 3 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.