पिंपरी – भाजपमधील एखाद्या नगरसेवकाला त्रास देण्यासाठी खासगी भूसंपादनाच्या विषयामध्ये बदल करण्यात येत आहे. एखाद्या नगरसेवकाला त्रास देण्यासाठी शहराला वेठीस धरू नये, तसेच महापौरांनी कोणाच्या रिमोट कंट्रोलवर पालिकेचे सभागृह चालवू नये, असे प्रतिपादन शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केले.
सोमवारी सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर कलाटे यांनी पत्रकारांशी संवाद साधत वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, महापौर या ज्येष्ठ आहेत. त्यांना सभागृहाचा आणि कामकाजाचा अनुभव असतानाही त्या कोणाच्या तरी सांगण्यावरून सभागृह चालवित आहेत. खासगी वाटाघाटीचा स्थायी समितीमधील सदस्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव केवळ भाजपाच्या एका नगरसेवकाला त्रास देण्याच्या उद्देशाने आणला आहे. मात्र, एकाला त्रास देण्यामुळे संपूर्ण शहर वेठीस धरले जात आहे. या निर्णयामुळे शहरातील शेकडो नागरिक होरपळले जात आहेत. त्यांच्या अंतर्गत वादात शहरातील इतर नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे.
स्थानिक नागरिक, भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांसाठी खासगी वाटाघाटीच्या विषयावर चर्चा करण्याची आम्ही मागणी करत असताना हुकूमशाही पद्धतीने सभागृह चालविले जाते, हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. ज्यांनी खासगी वाटाघाटीचा प्रस्ताव आणला आणि ज्यांनी मंजुरी दिली त्यांनी शहराच्या विकासासाठी एक इंचदेखील जागा दिलेली नाही. ज्या नागरिकांनी शहराच्या विकासासाठी जागा दिली त्यांचा विचार होणे गरजेचे आहे. स्थानिक आमदार या विषयामध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.