पाकिस्तानला सज्जड इशारा
गुरदासपूर: पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानला जाण्याआधी त्या देशाला सज्जड इशारा दिला. पाकिस्तानने काश्मीरमध्ये ढवळाढवळ करू नये. तसेच, पंजाबवर वाईट नजर ठेऊ नये, असे त्यांनी म्हटले.
भारतीय बाजूने कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्या सोहळ्यात बोलताना कॉंग्रेसचे नेते असणाऱ्या अमरिंदर यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत सुनावले. काश्मीरमध्ये तैनात असणाऱ्या भारतीय सुरक्षा दलांच्या नावे पाकिस्तान बोंबा मारत आहे. आता त्या देशाची वाकडी नजर पंजाबकडे वळली आहे.
नापाक कृत्ये टाळण्याचे मी अनेकदा त्या देशाला सांगितले आहे. त्यांचे कुटील कारनामे काश्मीर किंवा पंजाबमध्ये यशस्वी होणार नाहीत. पंजाबी लोक शूर आहेत. त्यांनी बांगड्या भरलेल्या नाहीत.
पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न उधळले जातील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. भारताशी शत्रुत्व ठेऊन पाकिस्तानला काय मिळणार आहे? त्या देशाने विकासावर लक्ष केंद्रीत करावे. पाकिस्तानी जनतेच्या भल्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही अमरिंदर यांनी दिला.