राममंदिर निकालाच्या मद्द्यावरून लोकांचा “सोशल अवेअरनेस’ वाढला
कवठे – सर्वोच्च न्यायालयात आज राम मंदिर प्रकरणी निकाल लागण्याची शक्यता वर्तविल्यानंतर कालपासून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नयेत, असे आवाहन करण्यात येत होते. व्हॉटसऍपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्या ग्रुपच्या अँडमिनवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही गेले तीन दिवस सोशल मिडियाच्या माध्यमातूनच कळविले जात होते.
त्यामुळे बहुतेक ग्रुपच्या अँडमिननी आज सकाळीच आपापल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल केला होता व फक्त अँडमिनच या ग्रुपवर मेसेज करू शकतो असे ग्रूपचे सेटिंग ठेवले होते. जेणेकरून या ग्रुपवर असलेल्या सदस्यांपैकी कोणालाही या ग्रुपवर मेसेजेस करता येऊ नयेत, याबाबतची काळजी अँडमिननी घेतल्याची बाब आज प्रकर्षाने जाणवली. यातूनच पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर संवेदनशील मुद्दा समजून याबाबत वक्तव्ये करण्याचे टाळले गेले. लोकांचा या निमित्ताने सोशल मीडियाबाबतचा खरा अवेअरनेस वाढल्याचे लक्षात येते.
ग्रुपचे अँडमिन याबाबत स्वतः मेसेज टाकत असून यामध्ये काही काळापर्यंत हे सेटिंग बदलल्याचे व सर्व ग्रुप सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहेत.
यानिमित्ताने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एकमेकांच्यावर चिखलफेक करणारी सोशल मीडियातील वक्तव्ये पूर्णत: थांबली असून यातून बाहेर पडून सोशल मीडियाही देशाच्या उन्नतीसाठीच वापरली पाहिजे, ही बाब अधोरेखित होत आहे.
देशात शांतता निर्माण व्हावी व ती टिकून राहावी या दृष्टीकोनातून सर्वच लोक एकमेकांना सहकार्य करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यातूनही काही ठिकाणी या गोष्टींचे उल्लंघन होत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही हे सेटिंग वापरले नाही, त्यांनी ते तत्काळ वापरावे व आपल्या ग्रुपवर आक्षेपार्ह संदेश येणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहनसुद्धा सध्या सोशल मीडियावरून पुन्हा पुन्हा केले जात आहे.