मंचर -ज्यांना करोनाची लक्षणे असतील त्यांनी घराच्या बाहेर पडू नये. आजारांची लक्षणे पाहून रुग्णाला गृह विलगीकरण किंवा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
मंचर येथील शरद सहकारी बॅंकेच्या सभागृहामध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यात करोनाची सद्यस्थिती याबाबत शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, बाजार समिती सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती संजय गवारी,
उपसभापती संतोष भोर, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, खेड विभाग उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील, महावितरणचे हेमचंद्र नारखेडे, डॉ. सदानंद राऊत, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील, सुरेश पठाडे, प्रकाश शेडेकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अंबादास देवमाने उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, करोनाच्या संदर्भात स्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या मंचर उपजिल्हा रुग्णालयात गंभीर रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरु झाले. अवसरी येथील कोविड सेंटरही सुरु झाले आहे. शिवनेरी जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यासाठी नियोजन सुरु आहे. पुणे येथील मिटींगमध्ये अवसरीच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये विषय मार्गी लावला आहे.
अवसरी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये सर्व रुग्णांची सोय होईल. तयारी पूर्ण केली आहे. व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढत आहे. सर्व यंत्रणा सज्ज आहे. गृहविलगीकरण असलेल्या रुग्णांना मंचर उपजिल्हा रुग्णालयातून सर्व औषधे मोफत दिली जाणार आहे. तसेच गृह विलगीकरण असलेल्या रुग्णांनी घराबाहेर पडू नये.
करोना वैद्यकीय उपचारासंदर्भात खासगी डॉक्टर आणि सरकारी डॉक्टर यांचा समन्वय राहिल्यास एकसारखे वैद्यकीय उपचार होतील. उपचारामध्ये विसंगती असू नये. यासाठी आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.