धान्य पुरवठा योजनांची मुदत संपणार
लोकायतच्या “रेशन आपल्या हक्काचे’ अभियानाला प्रतिसाद
पुणे – रेशन आपल्या हक्काचे अभियानाला राज्यभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वस्तीत राहणाऱ्या महिलांनी भाषण नको राशन द्या…, टॅक्सचा पैसा कशासाठी…मोफत रेशन मिळण्यासाठी, रेशन आपल्या हक्काचे, असे पोस्टर लिहून आपला आवाज सामाजिक माध्यमांमार्फतून उठवला.
मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वच उद्योगधंदे बंद होते. त्यामुळे नागरिकांची उपासमार होऊ नये, याकरिता राज्य सरकारने विविध योजनांतर्गत राज्यातील दारिद्य्ररेषेखालील, प्राधान्य कुटुंब व विनारेशनकार्ड नागरिकांना देखील धान्य पुरविले. या सर्व योजनांची मुदत दि. 30 जूनला संपत आहे. या सर्व योजनांना आणखी सहा महिने मुदतवाढ द्यावी, याकरिता सर्व लोकायतच्या वतीने सदर अभियान राबविण्यात आले.
राज्य सरकारने विनारेशनकार्डधारक असो की रेशनकार्डधारक (पिवळे/केशरी) यांच्यासाठी ज्या नवीन योजना चालू केल्या होत्या, त्याची मुदत 30 जूनला संपत आहे. अंत्योदय व प्राधान्य गटाला मिळणारे नेहमीचे धान्य सोडून बाकी सर्व योजनांची मुदत 30 जुनीला संपत आहे. सध्या, लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले असले तरी अर्थव्यवस्था परत रुळावर आणण्यासाठी, कष्टकरी वर्गाचे जीवन सुरळीत चालू होण्यासाठी व पूर्वपदावर येण्यासाठी आणखी बराच काळ जावा लागणार आहे. त्यामुळे ही योजना कमीत कमी 6 महिने वाढवण्याची मागणी, या अभियानात करण्यात आली आहे.
लोकायत संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि.25) राबविलेल्या ऑनलाइन अभियानात सहभागी होण्याकरिता रेशन साहित्यासोबत फोटो, व्हिडीओ पाठवण्याचे आणि स्वतःच्या सोशल मीडियावर टाकण्याचे आवाहन केले होते. याला नागरिकांनी प्रतिसाद देत फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल माध्यमांचा वापर करत रेशन योजनाबद्दल आपले म्हणणे मांडले.