आळंदी – हजारो वर्षांपासून तुकोबा-माउली लाखो वैष्णवांसोबत आषाढी एकादशीला पंढरपुरला पायी चालत विठोबाच्या भेटीला जातात. मात्र, यंदा करोनामुळे वारी रद्द झाली असली तरी परंपरेप्रमाणे माउली, तुकोबांच्या पादुका या पंढरीला जाणार आहे. पण या पादुका हेलिकॉप्टरने किंवा एसटी बसने घेऊन जायच्या यावर अनेक दिवसांपासून खलबते सुरू होती. अखेर ‘लालपरि’ने माउली, तुकोबांच्या पादुकांचे पंढरीकडे प्रस्थान होणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, यासाठी प्रशासनाने काही अटी आणि नियम घालून दिले आहेत.
करोना विषाणूच्या संकटामुळे या वर्षीचा पालखी सोहळा अगदी सध्या पद्धतीने होत आहे. दरवर्षी पालखी सोहळ्यादरम्यान तुकोबा-माऊलींच्या गजराने आळंदी आणि देहू नगरी दुमदुमून जायची. मात्र, यावर्षी अगदी 50 जणांच्या उपस्थितीत तुकोबांचे शुक्रवारी (दि. 12) तर शनिवारी (दि. 13) पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. मात्र, त्या मूळ मंदिरांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.
जिल्ह्यातून संतांच्या पादुकांना अटी आणि कार्यपद्धती अवलंबून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी तर संत तुकाराम महाराज संस्थान, देहु तसेच संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड आणि चांगावटेश्वर देवस्थान, सासवड यांना पंढरपूर येथे पादुका घेऊन जाण्यास विभागीय आयुक्तांची परवानगी मिळालेली आहे.
नियम व अटी
पादुकांसोबत बसमध्ये केवळ 20 जणांना परवानगी
60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना जाता येणार नाही.
पादुकांसोबत जाणार्या व्यक्तींची करोना चाचणी होणार
वाहन प्रवासात कोठेही दर्शनासाठी थांबवण्यात येणार नाही