Mohammed Shami : न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलच्या सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत मोठा विजय मिळवला. आतापर्यंत वर्ल्डकप 2023 मधील सर्व सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला आहे. न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत टीम इंडियानं फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर टीम इंडियाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने केलेल्या शतकांची चांगलीच चर्चा रंगली. त्यासोबतच मोहम्मद शामीच्या घातक गोलंदाजीचेही सर्वांनी कौतुक केले आहे. मात्र आता शमी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शमीबाबत दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग करत ‘मोहम्मद शामीला अटक करू नका’, असे ट्वीट केले आहे.
मोहम्मद शमीनं सामन्यात केलेल्या धडाकेबाज कामगिरीबाबत दिल्ली पोलिसांनी हे मजेशीर ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, “मुंबई पोलीस, आम्ही आशा करतो की, आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शामीला अटक करणार नाही.” याला उत्तर देताना मुंबई पोलिसांनीही एक गंमतीशीर ट्वीट करत लिहिले की, “दिल्ली पोलीस, तुम्ही असंख्य लोकांची मनं चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात आणि तुम्ही सहआरोपींची यादीही दिली नाही.”सध्या या ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
You missed pressing charges of stealing innumerable hearts @DelhiPolice and listing a couple of co-accused too😂
P.S.: Dear citizens, both the departments know the IPC thoroughly and trust you for a great sense of humour 😊 https://t.co/TDnqHuvTZj
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) November 15, 2023
मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 7 विकेट घेत किवी संघाचा धुव्वा उडवला. त्यानंतर टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याआधी टीम इंडिया 2011, 2003 आणि 1983 साली फायनलमध्ये पोहचली होती. आता भारतीय संघाचा 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. भारताचा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विराट कोहलीचे 50 वे एकदिवसीय शतक आणि श्रेयस अय्यरच्या शानदार शतकामुळे भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात 50 षटकात 4 गडी गमावून 397 धावा केल्या. शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनीही संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 117 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 105 धावांची खेळी केली. भारतीय कर्णधार रोहितने 29 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या.