-डॉ. ऋतु सारस्वत
कौटुंबिक हिंसाचार ही केवळ एका महिलेला होणारी पीडा नसून, येणाऱ्या पिढ्यांना मानसिकदृष्ट्या विकृत करणारी ही एक व्याधी आहे.
देशात महिलांच्या परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या अनुसार, 2019-20 मध्ये 22 राज्यांत केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, कर्नाटक, तेलंगण, आसाम, मिझोराम, बिहार या राज्यांमधील 30 टक्के स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात. 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सात प्रांतांमध्ये कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली आहे. सामान्यतः कोणतीही सामाजिक समस्या एखाद्या विशिष्ट कारणाशी जोडलेली असते आणि त्याबाबतीत पूर्वानुमान करण्यास समाजशास्त्रज्ञ सक्षम असतात. समाजशास्त्रज्ञांच्या भाषेत ज्याला “उपकल्पना’ असे म्हटले जाते, अशी ही कारणे शोधून काढल्यास अधिकांश प्रकरणांमध्ये ती बरोबर असल्याचे निष्पन्नही होते; परंतु कौटुंबिक हिंसाचार ही अशी एक सामाजिक व्याधी आहे, जिच्यासंदर्भाने कोणत्याही “उपकल्पना’ खऱ्या ठरलेल्या नाहीत.
सुरुवातीला असे मानले जात असे की, केवळ मागासलेल्या आणि अल्प विकसित देशांमध्ये ही समस्या दिसते. कारण, तेथे गरिबी आणि अज्ञान आहे; परंतु याच्या अगदी उलट अनुभव जगात दिसून येतो. जगातील सर्वाधिक विकसित देशांमध्ये ही समस्या विकसनशील आणि मागास देशांइतकीच गंभीर आहे. कौटुंबिक हिंसेच्या संबंधाने असेही म्हटले जात होते की, अशा घटना अल्पशिक्षित महिलांनाच या घटनांचा सामना करावा लागतो. परंतु हेही चुकीचेच असल्याचे निष्पन्न झाले. सुशिक्षित आणि कामकरी महिलांनाही अशिक्षित महिलांइतक्याच संख्येने कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागते. नाते कोणत्याही स्वरूपाचे असो, संपूर्ण जगभरातील एक तृतीयांश महिला कौटुंबिक हिंसाचार सहन करीत असतात, अशी आकडेवारी सांगते.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, घर हीच महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक जागा बनली आहे. 2017 मध्ये 87 हजार महिला आणि मुलींची जगभरात हत्या करण्यात आली. त्यातील 58 टक्के हत्या कौटुंबिक हिंसाचारातून घडलेल्या आहेत. वस्तुतः पुरुषांकडून महिलांना येणारे हिंसक अनुभव ही व्यवस्थेमुळे निर्माण झालेली समस्या आहे. आपल्या व्यवस्थेत पुरुषांना अगदी लहान वयापासूनच आक्रमक आणि प्रभावशाली बनण्यासाठी प्रवृत्त केले जाते. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोशाने या बाबतीत विस्तृत चर्चा केली आहे. “मर्दानगी’ची विषारी भावना युवकांच्या मनात कशी लहान वयापासूनच रुजवली गेलेली असते, याचे विवेचन कोशाने केले आहे. ज्या व्यवस्थेत पुरुष शक्तिशाली आणि नियंत्रकाच्या भूमिकेत असतो, अशा सामाजिक व्यवस्थेची सवय मुलांना लावली जाते. मुली आणि महिलांच्या बाबतीत प्रभुत्वाच्या भावनेतून व्यवहार करणे हेच पुरुषत्व आहे, हे त्यांच्या मनावर बिंबविले जाते.
समाजात प्रभुत्वाशी जोडली गेलेली ही भावना खोलवर रुजलेली असून, तिची पाळेमुळे पसरण्याचे कारण स्पष्ट आहे. ते म्हणजे, नियंत्रण ठेवू पाहणारा अत्याचार करीत राहतो आणि कमकुवत व्यक्ती सहन करीत राहते. एवढेच नव्हे तर अत्याचार सहन करणारी व्यक्ती हळूहळू तो अत्याचार वैधच असल्याचे मानू लागते आणि त्याविरोधात आवाजच उठवत नाही. “पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडिया’ या महिलांचे आरोग्य आणि लैंगिक संवेदना या विषयावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 62 टक्के महिला स्वतःच असे मानतात की, पतीने त्यांना मारहाण करणे योग्य आहे. आपल्यावर होणाऱ्या हिंसाचाराचे समर्थन एखादी व्यक्ती कशी काय करू शकते, हा प्रश्न पडतो. वस्तुतः एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाणारी ही एक मनोभूमिका आहे; मानसिकता आहे. या मानसिकतेची पेरणी मुलीच्या मनात तिच्या लहानपणीच केली जाते. घराच्या तथाकथित मानमर्यादेचे वहन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पीडा सहन करणे योग्यच आहे, असे तिच्या मनावर ठसविले जाते.
दुसरी गोष्ट अशी की, पुरुष हा घरातील कर्ता आहे आणि क्रोध हा त्याचा सहजभाव आहे, असे मानले जाते. त्यामुळेच त्या क्रोधामधून त्याच्या हातून होणारी हिंसाही घराघरात समर्थनीय मानली जाते. सामान्य आणि स्वाभाविक मानली जाते. अशा सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीच्या पार्श्वभूमीवर, कोणत्याही महिलेला कौटुंबिक हिंसाचाराच्या विरुद्ध कायदेशीर मदत देणे हे अत्यंत जटिल काम असते. कारण स्त्रीला असे वाटत राहते की, आपण कायद्याची मदत घेतली तर आपल्याला नाती जोडून ठेवणे अशक्य होणार आहे. महिला सशक्तीकरणाचे मोठमोठे दावे आजवर केले गेले असले तरी, नातेसंबंध तुटल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आणि दोष महिलेलाच दिला जातो आणि मानसिक पीडाही तिलाच सहन करावी लागते, हे आपण नाकारू शकत नाही. अशा स्थितीत कौटुंबिक हिंसेविरुद्ध लढणे सोपे नाही. कौटुंबिक हिंसा रोखण्यासाठी संपूर्ण समाजाचा सहभाग आवश्यक आहे.
यासंदर्भातील युगांडा मॉडेल चर्चेत असून, सुमारे वीस देश हे मॉडेल आचरणात आणत आहेत.
युगांडामध्ये पुरुष-स्त्री संबंधांमध्ये समानता आणण्यासाठी आणि महिलांविषयी पुरुषांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी समुदायात सामंजस्यपूर्ण आणि समानतेवर आधारित संबंध प्रस्थापित करण्याचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये 52 टक्क्यांची घट झाल्याचे युगांडात दिसून आले आहे. आणखी एक मॉडेल दक्षिण आफ्रिकेचे आहे. तेथे कौटुंबिक हिंसाचाराची नकारात्मक बाजू उघड करण्याचा तसेच लैंगिक समानतेच्या लाभांचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याद्वारे महिलांचा सामाजिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न दक्षिण आफ्रिकेत सातत्याने सुरू आहे.