-ह.भ.प. संतोष म. शास्त्री
तीर्थ व्रतनेम भावेवीण सिद्धी ।
वायांची उपीधि करिसी जना ।।
संत ज्ञानेश्वर महाराज ( Sant Dnyaneshwar Maharaj ) हरिपाठातील बाराव्या अभंगात म्हणतात, तीर्थव्रत व नेम यांची पूर्णतः तेव्हाच होऊ शकते जेव्हा ती साधने करीत असता हरिविषयी पूर्णभाव असेल, तरच या साधनांच्या आचरणाने सिद्धी प्राप्त होईल.
व्रत कोणते करावे यासंदर्भात संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj ) म्हणतात,
व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर । पुण्य ते असे गातां नाचतां फार । पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्वते ।।
म्हणजेच, एकादशी व सोमवार ही व्रते करा. त्या दिवशी सकाळी देवाचे पूजन व रात्री हरिकथा करून जागर करावा. नाम गाऊन आनंदाने नाचले असता फार पुण्य आहे. त्याला खरोखर पुन्हा जन्ममृत्युरूपी संसारात येणे नाही.
तुकोबाराय म्हणतात, एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणों ।। दर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी व आठवड्यातून येणारा सोमवार ही व्रते जे करीत नाहीत ते कोणत्या गतीला जातील हे मला कळत नाही.