ठाणे – डोंबिवली उपनगरातील प्रदुषण निर्माण करणारे कारखाने अन्यत्र हलवण्याची सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केली आहे. हे कारखाने कोठे हलवायचे ती जागा येत्या पंधरा दिवसात निश्चीत करा अशी सुचना आपण संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्री आज कल्याण येथे होते. त्यावेळी त्यांनी कल्याण आणि डोंबिवलीच्या भागातील समस्यांचा एका बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना ही सुचना केली.
डोंबिवलीतील रासायनिक कारखान्यांमधील विषारी घटक आणि अन्य टाकाऊ पदार्थ या भागात टाकले जात असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदुषण निर्माण होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. निवासी भागातील हे रासायनिक कारखाने बाहेर हलवण्याची तातडीची गरज असून त्यासंबंधात पहाणी करून हे कारखाने कोठे हलवायचे याची जागा पंधरा दिवसात निश्चीत करण्याची सुचना आपण अधिकाऱ्यांना केली आहे असे त्यांनी सांगितले. प्रदुषण निर्माण करणाऱ्या कारखान्यांची जागेवर जाऊन पहाणी करून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची सुचना आपण प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना केली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ठाकरे म्हणाले की, आज विविध शहरांमध्ये बाद झालेली वाहने ठिकठिकाणी सोडून दिलेली आढळून येतात त्याच्या संबंधातील एक धोरण निश्चीत करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. रासायनिक कारखाने असलेल्या भागातील पाईप लाईन खराब झाल्याचे किंवा त्या पुर्ण चोकअप झाल्याचेही अनेक प्रकार होत आहेत. त्या संबंधातही त्वरीत उपाययोजना करण्याचा आदेश आपण संबंधीत अधिकाऱ्यांना दिला आहे असे त्यांनी सांगीतले. या शहरातील रस्ते दुरूस्तीसाठी शंभर कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.