सोलापूर – शहरात भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षात तब्बल पाच हजारांहून अधिक नागरिकांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर महानगरपालिकेने याबाबतची माहिती दिली आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. मात्र, या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पथक नसल्याचे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातून सांगण्यात येत आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. प्राणीमित्रांचे म्हणण्यानुसार लोक शिळे अन्न रस्त्यावर टाकून देतात, चायनीज गाडे, हॉटेल चालक, मांस-मच्छी विक्रेते शिल्लक मांस रस्त्यावरच टाकून देतात. यातून भटकी कुत्री अधिक हिंस्र होत आहेत.
महापालिकेने दोन वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी एक पथक नेमले होते. मात्र सध्या हे पथक कार्यरत नाही. त्यातील काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे. पशुवैद्यकीय विभागाकडे सध्या केवळ एक कामगार असल्याचे सांगण्यात येते. हा एकटा माणूस शहरातील कुत्र्यांचा कसा बंदोबस्त करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.