रामगढ – झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात एका अपघातानंतर मोटारकारला लागलेल्या आगीत या कारमधील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना मुरबंदा गावाजवळ घडली. या मोटारीला बसची धडक बसली. त्यात बसचा चालकही जखमी झाला आहे.
कार वॅगनॉर बनावटीची होती. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमाराला दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर ही आग लागली. आग लागल्यानंतर आतील प्रवाशांना बाहेर पडणे मुश्कील झाल्याने त्यांना त्वरित या आगीने वेढले.
स्थानिक रहिवाशांनी त्याना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मृतांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. हे मृत पाटण्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.