करोनाचा कहर आता कुठे आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत असतानाच आता बर्ड फ्लूमुळे लोकांची चिंता पुन्हा वाढली आहे. देशभरात अनेक ठिकाणी बर्ड फ्लू झाल्यामुळे कावळे, कोंबड्या आणि अनेक पक्षी मरून पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यात आता चिकन किंवा अंडी खाल्यामुळे माणसांमध्येही हा रोग पसरतो, अशी अफवा अशा बातम्या समोर येत आहेत. पण यासंबंधी एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. पाहुयात यात किती तथ्य आहे.
चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू हा माणसांना अजिबातच होत नाही. भारतात बर्ड फ्लू माणसांना झाल्याची आजपर्यंत एकही घटना घडलेली नाही. असं स्पष्टीकरण तज्ज्ञांनी दिले आहे. वास्तविक, कोणताही आहार घेताना तो स्वच्छ धुतला गेला पाहिजे. त्याला उकळून खाल्ल पाहिजे. त्यामुळे तुम्हीही जर चिकन आणि अंडी खात असाल ती पूर्ण उकळून खाल्ली पाहिजेत. ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात घटना समोर आल्या असतील तिथे फक्त अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या 20 वर्षांचा इतिहास पाहिला तर पक्षांमधील रोग हा माणसाला झाल्याच्या घटना नाहीत. पण हा रोग पक्षांमधून प्राण्यांमध्ये आणि त्यानंतर माणसांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे रोगाच्या घटना फार कमी प्रमाणात आहे. अवघ्या एक हजार लोकांना हा रोग आतापर्यंत झाला असावा. पण भारतामध्ये अद्यापपर्यंत असे एकही प्रकरण नाही.
करोनाच्या बाबतीत जशी आपण काळजी घेतो. त्याच पद्धतीने स्वच्छता आणि निर्जंतूकीकरण करणं महत्त्वाचं आहे. साधारणपणे आपण मांस उकडून, भाजून, गरम करून आणि त्यावर प्रक्रिया करून खातो. त्यामुळे अशा तापमानात कोणताही धोका होणार नाही. थोडक्यात काय तर काळजी घेऊन मांसाहार केल्यास या रोगाचा धोका कमी आहे.