बारामती -पतीसोबत झालेल्या वादानंतर तळ्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईच्या पाठोपाठ तळ्यात गेलेल्या दोन निष्पाप चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बारामती तालुक्यातील पिंपळी येथे घडली.
शौर्य (वय दोन) आणि दिव्या अतुल सूर्यवंशी (वय चार) असे मृत्यू झालेल्या दोन चिमुकल्या भावंडांची नावे आहेत. पिंपळी येथे शनिवारी (दि.29) पहाटे तीन वाजता अतुल यांचा पत्नी अंजलीशी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातून पहाटे अंजली यांनी रागाच्या भरात आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी पीएमडी दूध प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या तळ्याकडे गेली. त्यापाठोपाठ दोन मुले धावली. अंजली यांनी तळ्यात उडी मारली.
त्यानंतर घाबरलेल्या दोन मुलांनीही आई पाठोपाठ तळ्यात उतरले. त्यानंतर वाचवा वाचवा असा गलका आल्यानंतर छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण आणि पती अतुल सूर्यवंशी यांच्यासह दूध डेअरीमधील कर्मचाऱ्यांनी तिघांना तळ्याबाहेर काढले.
त्यांना तातडीने बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वी दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, गावात या घटनेची मात्र वेगळी चर्चा सुरू असून, मुलांसह महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.