सगळ्यांच्याच मनात ही इच्छा असते की, पक्षी व्हावं आणि उंच आकाशात विहार करावं, या जगापासून दूर…
पक्ष्याचं विश्व कुतूहल जनक आहे. इंटरनेटमुळे आपल्याला खूप नवे पक्षी कळले. त्यांची नावे कळली. हे पक्षी साधारणपणे कुठल्या प्रांतात असतात हेही कळलं. या पक्षांचे रंग किती वेगवेगळे आणि मनोहारी असतात. अशा रंगसंगतीची आपण कल्पनाच करू शकत नाही. पंचरंगी पोपट पण प्रत्येकाची रंगसंगती वेगळी. लाल, पिवळा, निळा, चोच काळ्या रंगाची. निसर्गाची किमया अफाट आहे. आपण पक्षांची नावं त्यांच्या रंगावरून बहुदा ठरवली असावी.
सकाळी उठताना कोकिळेचा गोड आवाज ऐकला की प्रसन्न वाटतं. दिवस चांगला असं आपण मनाशी ठरवून टाकतो. ते खरं तर आपल्यावर अवलंबून असतं. पण आपण या पक्ष्यांशी आपले शकुन अपशकुन जोडतो. भारद्वाज दिसणं शुभ मानले जातं.
त्याचा थाट राजेशाही असतो ना !
प्रत्येकाचा आवाज वेगळा, ओरडण्याची पद्धत वेगळी. आपल्या कानात तो आवाज एकदा बसला की आपण लगेच तो पक्षी लांबवरूनही ओळखतो. पक्षी संध्याकाळी थव्याने घरी का जात असतील, जाताना पोपट खूप ओरडतात, का ओरडत असतील, आपल्या येण्याचा निरोप घरट्यातल्या पक्ष्यांना तर देत नसतील. त्यांची घरटी तर किती सुबक.
सुगरणीचं बघा, सुतार पक्ष्यांचं बघा, अगदी चिमणीचं बघा. सुतार पक्षी थोडासा कापूस वापरून धागा घालतो आणि घरटं पक्कं करतो, हे कोण शिकवतं. सुगरणीचं घरटं तर लांबी रुंदीने मोजून बघावं, माणसं चुकतील पण ते नाही. काही पक्षी तर वड, पिंपळ अशा उंच झाडांवर घरटं बांधतात. पिल्लांचे रक्षण व्हावं म्हणून.
मारुती चितमपल्ली यांनी लिहिलंय की, पक्षी त्यांच्या पिल्लांच्या जन्माचा सोहळा म्हणजे पिल्लू अंड्यातून बाहेर येताना अनिमिष नेत्रांनी बघत असतात. पिल्लू हरवलं की आईचा जीव किती कासावीस होतो, ती न थकता आपल्या पिल्लाला हाका मारत असते.
पक्षी स्थलांतर करतात ते का करतात, यामागे त्यांचे काय संकेत असतील, पाण्याच्या शोधात येतात की ते जिथे असतात तिथली हवा बदलते म्हणून येतात. जिथे स्थलांतरित होतात तिथे काय करत असतात. पानगळ होते, झाडांच्या रिकाम्या फांद्या उरतात तेव्हा हे कुठे जात असतील. आपल्यासारखंच यांनाही पावसात भिजायला आवडत असेल का?
चिमणी, कावळा यांची ओळख आपल्याला लहानपणी होते. कारण आपल्या आसपास तेच असतात. पक्षी आपल्या काव्याची प्रेरणा आहेत. प्रणयाराधनालाही पक्ष्यांची उपमा दिली जाते. इतके ते आपल्याजवळचे आहेत. मुलांना पक्ष्यांची ओळख व्हावी म्हणून त्यांना पक्षी दाखवायला नेतो, हे पिंजऱ्यात बंद असलेले पक्षी बाहेर येण्यासाठी किती धडपड, पंखांची फडफड करत असतात. माणसाला कैदेत ठेवल्यावर त्याच्या मनाची जी अवस्था होते ना तशीच या पक्ष्यांचीही होत असणार. मध्यंतरी लव्ह बर्डस लोक पाळायचे त्या पिंजऱ्यातल्या पक्ष्यांची अवस्था बघवत नसे.
आकाशात विहार करणं हा पक्ष्यांचा धर्म आहे. आपण त्यांना त्यापासून दूर करतो. वास्तविक पक्ष्यांचं आकाशात झेपावणं, हेलकावे घेणं यातून विमानाचा शोध लागला. हे आपण विसरता कामा नये.
कॉंक्रिटच्या जंगलामुळे, केबलमुळे पक्ष्यांचं विश्वच आपण खरं तर उद्ध्वस्त केलं. त्यामुळे जिथे मोकळी वस्ती आहे, त्यांना घरटं करायला जागा आहे तिथे ते गेले. त्यांना प्यायला पाणी देणं ही आपली जबाबदारी आहे. माझ्या ओळखीचे एकजण मला सांगत होते की, ते रोज सकाळी साडेआठ वाजता चिमण्यांसाठी पाणी आणि बिस्किटे ठेवतात. एके दिवशी हातात काम असल्यामुळे ठेवायला उशीर झाला तर चिमण्यांनी त्याला तोंड लावलं नाही. तेव्हापासून ते वेळ चुकवत नाही.
माणसं स्वतःचं घर सजवण्यासाठी सुगरणीचं घरटं घरात लावतात. पण आपलं घर सजवण्यासाठी दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करायचं ही कुठली कलात्मक दृष्टी! पक्ष्यांना बघण्याची संधी मिळावी आणि पक्ष्यांनाही पिंजऱ्यात कोंडून ठेवले जाऊ नये म्हणून मुद्दाम झाडं लावून बागा तयार करून त्यांची जोपासना केली जाते. आपल्याला जर स्वातंत्र्य हवं आहे तर आपण इतरांचं स्वातंत्र्यही जोपासले पाहिजे, हे नक्की.
डॉ. नीलम ताटके