मुंबई – महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. या सरकारकडे पूर्ण बहुमत असलं तरी न्यायालयात सुरु असलेल्या अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार शिंदे गटातील आमदारांवर आहे. त्यामुळे हे सरकार कोसळण्याची भीती वाटते का ? असा सवाल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला.
उद्यापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये नियमितपणे राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर हे सरकार जाणार की राहणार याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील सरकार जाणार का राहणार याबाबत भाष्य केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी सरकार पडण्याची भीती वाटते का या प्रश्नाला पहिल्यांदाच स्पष्टपणे उत्तर दिले.
“आमचं सरकार हे लोकांच्या मनातील सरकार आहे त्यामुळे सरकार पडण्याची भीती माझ्या मनात नाही,मला कसलीही भीती वाटत नाही असं स्पष्ट मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. आमच्याकडे मिरची आहे. चाळीस आमदार बारा खासदार आमच्यासोबत आहेत त्यामुळॆ आम्हाला सरकार पडण्याची भीती वाटत नाही असंही शिंदे यावेळी म्हणाले.