पुणे (विजयकुमार कुलकर्णी) – दोघांनी अवघा एक महिनाच संसार केला. त्यानंतर वैचारिक मतभेदामुळे 25 महिने वेगळे राहणाऱ्या दांपत्याचा घटस्फोट अवघ्या एक दिवसात कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आर.एस.आराध्ये यांनी मंजुर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे 18 महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे 25 महिन्यांपसून वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. माधवीच्या वतीने ऍड. शिल्पा टापरे, ऍड. अनिकेत भोसले आणि ऍड. तेजस वीर यांनी काम पाहिले. डिसेंबर 2020 मध्ये दोघांचे लग्न झाले. दोघेही पुण्यातीलच आहेत. एक महिना संसारानंतर जानेवारी 2021 पासून दोघे विभक्त राहू लागले. एप्रिल 2022 मध्ये पतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. त्याला पत्नीचे वकील हजर राहिले. त्यानंतर दोन्ही पक्षात बोलणी झाली. परस्पर संमतीने अर्ज दाखल करण्याचे ठरले. त्यानुसार केलेला अर्ज न्यायालयाने एका दिवसात मंजुर केला.
दोघेही 25 महिन्यापासून वेगळे राहत होते. समुपदेशन आणि झालेल्या बोलणीमध्ये ते एकत्र येणे शक्य नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या परिस्थितीत न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. आता दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.
– ऍड. शिल्पा टापरे, महिला आशिलाच्या वकील.