मुंबई -मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात केवळ खानपानाचे बिल 2 कोटी 38 लाख रुपये आले असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट “प्रभात’ने काही दिवसांपूर्वी केला होता. एवढेच नाही तर हे बिल अवघ्या चार महिन्यांचे असल्याचेही त्यामध्ये म्हटले होते. या बातमीचा संदर्भ घेत, “चहामधून सोन्याचे पाणीही प्यायला देतात का? असा सवालच अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची घोषणाही पवारांनी केली. अजित पवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही. पण एसटीच्या जाहिराती पानभर केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. जाहिरातीसाठी मुंबई पालिकेच्या तिजोरीतून 17 कोटींचा खर्च करण्यात आलाय. तर दुसरीकडे वर्षा बंगल्यावर चहापानासाठी अवघ्या चार महिन्यांत 2 कोटींचा खर्च केला जातो, यावरूनही त्यांनी संताप व्यक्त केला.
जिल्हा नियोजन समितीमार्फत होणारी कामे होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामीण भागासाठी निधी मंजूर केला जातो. मात्र, कामेच केली नसल्याने हा निधी पुन्हा परत जाणार आहे. दुसरीकडे सरकारकडून उधळपट्टी सुरू आहे. जाहिरातबाजीवर रोज अडीच लाखांचा खर्च येत असल्याचे गणितही बाजूला बसलेल्या छगन भुजबळ यांनी यावेळी मांडले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची रविवारी मुंबईत बैठक झाली.
स्वतःच्या फोटोसाठी जनतेचा पैसा का?
गेल्या आठ महिन्यांत सरकारकडून जाहिरांतीवर 50 कोटी रुपये खर्च झाला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून माहिती घेतली तेव्हा समजले की तिथून जाहिरातींवर खर्च करण्यासाठी 17 कोटी घेण्यात आले आहेत. म्हणजे तुमचा खर्च, तुमचे हसरे फोटो दाखवण्याकरता जनतेच्या पैशांची उधळपट्टी करतात, असेही पवार म्हणाले.
चहापानावर बहिष्कार
गेल्या आठ-नऊ महिन्यांत मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारेचे काम अत्यंत सुमार आणि महाराष्ट्राला मान खाली घालणारे आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात करून तुम्ही मराठी माणसाचा अभिमान बिंदू असलेली शिवसेना फोडली आणि त्यांचे चिन्ह तुम्ही घेतले, याचा राग जनतेच्या मनामध्ये आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षासमोरील आव्हानाच्या काळात महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष शिवसेनेसोबत भक्कमपणे आहोत. त्यामुळे त्यांच्या चहापानाला उपस्थित राहणे हा महाराष्ट्रद्रोह ठरला असता, त्यामुळे आम्ही एकमताने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे, असेही पवार यांनी यावेळी म्हटले आहे.