पुणे – आपले गडकिल्ले हे महाराष्ट्राचा जिवंत इतिहास आहेत. तो अनुभवण्यासाठी अनेक हौशी मंडळी किल्ल्यांवर भ्रमंती, ट्रेक करतात. मात्र, काही अतिहौशी लोक या वास्तूंचे पावित्र्य राखत नाहीत. त्यामुळे गडप्रेमींना किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवावी लागते. या इतिहासाचे संवर्धन करायचे असेल तर आपले गड-किल्ले स्वच्छ ठेवण्यासाठी स्वत:पासून प्रयत्न झाले, तरच आपले संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन पुढच्या पिढीला घडेल.
काही हौशी पर्यटक गड-किल्ले पाहताना तेथे मौज-मजेसाठीच येतात का? असा प्रश्न निर्माण होतो. ही मंडळी पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या गडावरच फेकतात. काही महाभाग तर गडावरील दगडांवर आपली नावे कोरतात. काही ठिकाणी पार्ट्याही झडतात. उलट अशा ठिकाणांचे पावित्र्य जपायचे असेल तर तेथे कोणताही कचरा होणार नाही,
याची प्रथम काळजी घेतली पाहिजे. गडावरील स्मारके, पाण्याची तळी, तटबंदी, दरवाजे, मंदिरे यासह विविध वास्तूंचे संवर्धन आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला अनेक गडप्रेमी नियमितपणे गडभ्रमंती करतात, त्या गडाचा इतिहास जाणून घेतात. त्यांच्यासारख्या इतर दुर्ग-प्रेमींना तिथल्या गड-किल्ल्यांबद्दल माहिती सांगतात.
काही संस्था आहेत, ज्या शाळा-महाविद्यालयाच्या मुलांना इतिहास अभ्यासासाठी गडावर नेतात. त्या काळातल्या गोष्टी सांगून, तसे वातावरण निर्माण करून इतिहास जिवंत करून सांगतात. मात्र, आता त्याचबरोबर गडाचे पावित्र्य राखण्याबाबतही जागृतीची वेळ आली आहे.
शासकीय नियमांत अडकू नका
सर्वाधिक किल्ले असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. येत्या काळात किल्ल्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन व काटेकोर संरक्षण व्यवस्था करणे आवश्यक आहे. “आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे’ याप्रमाणे पुरातत्व विभाग, केंद्र शासन आणि राज्य शासनांनी प्रशासकीय बाबींमध्ये जास्त न अडकता स्मारक-गड-किल्ले जोड योजनेला प्राधान्य द्यावे. गड-किल्ल्यांची डागडुजी तत्काळ करणे आवश्यक आहे.
दत्तक किल्ले मोहीम राबवावी
गावांचा विकास करण्यासाठी आपण “गाव दत्तक’ घेतो. त्याचप्रमाणे “गड किल्ले दत्तक’ मोहिम राबविणे आवश्यक आहे. नक्कीच त्यातून गड-किल्लयांचा विकास होण्यास मदत होईल. त्यासाठी पुरातत्व विभागाच्या परवानगीने ही प्रक्रिया होऊ शकते. त्यामध्ये नक्कीच शिवप्रेमी मोठ्या संख्येने पुढे येतील आणि गडाची स्वच्छता, पावित्र्य राखण्यास मदत होईल, अशा संकल्पनेची चर्चा सुरू आहे.