नवी दिल्ली – देशात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. या लाटेला रोखण्यासाठी सर्व यंत्रणा दिवसरात्र एक करून काम करत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांकडून रोज जावई शोध लावण्यात येत आहेत. या मंत्र्यांच्या यादीत आता आणखी एकाचा समावेश झाला आहे.
नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत येणाऱ्या भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नागरिकांना आता गोमूत्र पिण्याची आणि गो पालन करण्याचे आवाहन केले आहे. गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचा संसर्ग दूर होतो. करोना बरा होतो. मी स्वत: गोमूत्र घेते, त्यामुळेच मला कधी कोणतं औषध घ्यावं लागलं नाही. मला कोरोनाही झाला नाही, असे प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.
आता त्यांच्या या विधानावरून राजकारण तापू लागले आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे आमदार पीसी शर्मा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहिलं.या पत्रासह त्यांनी आरोग्यमंत्र्यांना गोमुत्रदेखील पाठवलं आहे.
या पत्रात शर्मा यांनी गोमुत्र प्राशन केल्यानं कोरोनावर उपचार होऊ शकतात हे डीआरडीओ आणि आयसीएमआरनं वैज्ञानिकदृष्ट्या मान्य केलं आहे का?असा सवाल शर्मा यांनी पत्राद्वारे केला.
त्यांनी या पत्रात पुढे लिहिले आहे की,’करोनानं त्रासलेल्या जनतेला वैज्ञानिकदृष्ट्या कोरोनापासून वाचण्यासाठी तुम्ही योग्य संदेश द्याल अशी अपेक्षा करतो,” असेही त्यांनी या पत्रात लिहिले आहे. दरम्यान, प्रज्ञासिंह ठाकूर या त्यांचा अजब विधानामुळे पुन्हा एकदा त्या सोशलवर चांगल्याच ट्रोल झाल्या आहे.