अहमदनगर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा करण्यासाठी ई-पास काढलाय का ? असा प्रश्न कोपरगाव येथिल आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी मुख्य सचिवांना विचारला आहे. दोन दिवसांपूर्वी फडणवीस हे नगर जिल्ह्यात आले होते. त्यापूर्वी ते औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात जाऊन आले होते. याशिवाय त्यांनी राज्यात सुद्धा अनेक दौरे केले आहेत. यासंदर्भात काळे यांनी विचारण केली आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनामुळे जिल्हाबंदी आहे मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरे करत आहेत. त्यांच्या या दौऱ्यांमुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लघन होत आहे. अशी तक्रार कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.
फडणवीस यांनी गेल्या रविवारी कोपरगावचा दौरा केला असून भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली होती. यासंदर्भात काळे यांनी माहितीच्या अधिकारात राज्याच्या मुख्य सचिवांकडे अर्ज केला आहे. त्यामध्ये फडणवीस यांनी जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमानुसार अर्ज केला आहे का? अशी त्यांनी माहिती मागविली आहे.