पुणे – देशभरात करोना रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागामध्येही करोनाची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याबरोबरच पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने मंगळवारी रात्रीपासून भर घातली आहे. त्यामुळे दारात करोना अन् अवकाळी जगू देईना, अशी अवस्था शेतकऱ्यांची होऊन बसली आहे. प्रशासनाने आरोग्याच्या पातळीवर अधिक भरीव पद्धतीने प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आणि शाळांनाही सुटी मिळाल्यामुळे येथे राहण्यापेक्षा गावी निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षित राहू हा विचार करून अनेकांनी गाव गाठले आहे. मात्र, शहरांतून गावामध्ये येणाऱ्यांचीही करोना चाचणी होणे गरजेचे आहे. आजही अनेक रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आहे. व्हेन्टिलेटरची उपलब्धता नाही. ग्रामीण भागामध्ये काही झाले तर रुग्णाला जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य केंद्रात न्यावे लागते.
दुर्दैवाने त्यामध्ये अवकाळी पावसाने भर घातल्यामुळे साथीचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी येथील आरोग्ययंत्रणा तयार आहे का, याचाही विचार करायला हवा. पुणे शहरासह जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव, दौंड, पाटस, यवत तसेच इंदापूर तालुक्यातील काही भागात मंगळवारी रात्री व बुधवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
सध्या उन्हाळा तापू लागल्यानंतर गावागावांमध्ये पाण्याचा तुटवडा भासणार आहे. स्वच्छता आणि पाणी यांचा नजिकचा संबंध असल्यामुळे अतिरिक्त पाणी कुठून आणणार, हा प्रश्न गावागावात मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. त्याशिवाय मास्क, सॅनिटायझरची पुरेशी उपलब्धता नसल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणांहून येत आहेत. गावांमधल्या जत्रा आणि इतर मोठे उत्सव रद्द करण्यात आले आहेत.
साथीचा प्रादुर्भाव झाला तर विलगीकरणाची व्यवस्था घरात आणि रुग्णालयांमध्ये कशी करावी यासाठीही गावागावांतून जनजागृती करण्याची गरज आहे. बुधवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यात काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका, कलिंगड, खरबूज तसेच भाजीपाला पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे सद्या केंद्र, राज्य सरकारसह ग्रामीण भागातही नागरिकांना घरात बसून स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी चिंताग्रस्त
इंदापूर तालुक्यातील कळस, डिकसळ, पळसदेव, भवानीनगर या भागातील द्राक्ष, डाळिंब, गहू, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे घराबाहेर पडावं तर करोना रोगामुळे देशात ऑल डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस घराबाहेर जाऊ देत नाहीत. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.