नवी दिल्ली – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मोहन यादव यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे. गेल्या काही काळापासून अनेक नेत्यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम केल्याचा संदर्भ देताना ते म्हणाले की भारत जोडो यात्रा नाही तर कॉंग्रेस छोडो यात्रा सुरू आहे.
ते यात्रा करत आहेत आणि पाठीमागे एका पाठोपाठ एक पक्ष कॉंग्रेस पक्ष सोडताना दिसत आहेत असे नमूद करत मोहन यादव यांनी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कमलनाथ यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबतही भाष्य केले. जे दारात उभे आहेत ते आज ना उद्या आत प्रवेश करतीलच असे सांगत त्यांनी कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता अद्याप कायम असल्याचे सूचित केले. कॉंग्रेस पक्षाच्या घराणेशाहीचा उल्लेख करत भाजप सगळ्यांचा पक्ष असल्याचे ते म्हणाले.
शिवराज सिंह चौहान या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने प्रदीर्घ काळ मध्य प्रदेशची धुरा सांभाळली आहे. आता या वेळेच्या विधानसभा निवडणुकीत चौहान विजयी झाले असले तरी त्यांच्याऐवजी यादव यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे तुमचे चौहान यांच्यासोबतचे समीकरण कसे आहे, त्यांचा तुमच्यावर काही दबाव आहे का, कारण तुम्ही त्यांची खुर्चि हिरावून घेतली आहे असे प्रश्न यादव यांना विचारण्यात आले.
त्यावर आपण त्यांची खुर्ची घेतली नाही तर त्यांनी स्वत: आपल्याला खुर्ची दिली असल्याचे यादव म्हणाले. काही दिवसांपूर्वीच मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या रॅलीतही सहभागी झालो होतो. त्यानंतरही एका कार्यक्रमात आम्ही दोघे एकत्र आलो होतो. आमचे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध आहेत असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या निवडीच्या संदर्भातील आतली माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले त्यावेळी मध्य प्रदेशातील माझ्या काही मित्रांसोबत मी एका कार्यक्रमात गप्पा मारत होतो. कोणाला मुख्यमंत्री करणार याबाबत आमची बोलणी सुरू होती आणि अचानक माझ्याच नावाची घोषणा करण्यात आल्यामुळे मला धक्काच बसला. माझ्या कानांवर माझाच विश्वास बसत नव्हता.