-ह. भ. प. जगन्नाथ गर्जे
मूळ ग्रंथीचिया संस्कृता। वरी मऱ्हाटी नीट पाहतां। अभिप्राय मानलिया चित्ता। कवण भूमी न चाजवे।।
ज्ञानेश्वरी हा एक प्रतिभासंपन्न ग्रंथ आहे. गीतेवरती टीका आहे. म्हणून तिला दुय्यम स्थान नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानेश्वरी नीट पाहिली, अर्थदृष्टीने वाचली आणि त्यातील गंभीर अभिप्राय मनाला योग्य प्रकारे पटल्यानंतर वाचकांना असा संशय निर्माण होईल की, मुख्य जागा कोणती आहे.
गीतेवरती ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीवरती गीता आहे. एवढा समरस ग्रंथ आहे. नेमका मूळ ग्रंथ कोणता याचा ठिकाणा लागणार नाही. जसे एखादी सुंदर स्त्री आहे आणि शरीरावर अलंकार देखील आहेत यात कोण कुणाचे सौंदर्य वाढवते आहे, हे समजत नाही.
माऊली म्हणतात,
जैसे अंगाचेनि सुंदरपणे। लेनिया अंगाची होय लेणे। तेथ अलंकारीले कवणे। हे निर्वचेना।।