-हेमंत देसाई
टाळेबंदी आणि वर्क फ्रॉम होममुळे मिळालेला वेळ या कारणांमुळे या लोकांची शेअर बाजारातील रुची वाढली आहे.
गेल्या काही वर्षांत लहान गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांकडे आकर्षित करून घेण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अर्थात एसआयपीची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये एसआयपीमध्ये 7 हजार 302 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. गेल्या 31 महिन्यांतील हा नीचांक आहे. यापूर्वी एप्रिल 2018 मध्ये यापेक्षा कमी, म्हणजे 6 हजार 690 कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीमध्ये आली होती.
करोना संसर्गाच्या आधी मासिक सरासरी आठ हजार कोटी रुपयांवर असलेला एसआयपीचा ओघ हा जून 2020 मध्ये सर्वप्रथम या पातळीखाली गेल्याचे दिसून आले. याचा सगळ्यात जास्त तडाखा समभागसंलग्न म्हणजेच इक्विटी फंडांना बसला. सलग पाचव्या महिन्यात इक्विटी फंडांना गळती लागली आहे. नोव्हेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी या फंडातूंन गुंतवणूक काढून घेण्याचे प्रमाण सर्वाधिक, म्हणजे 12 हजार 917 कोटी रुपये इतके होते. सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसेंदिवस शिखर गाठत असताना, म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मात्र वेगळेच चित्र समोर येत आहे.
एप्रिल ते जून 2020 या कालावधीत भारतातील “रॉबिनहूड गुंतवणूकदारांनी’ मात्र प्रवाहाबाहेरचा विचार केला आणि त्यात त्यांना यशही आले. अमेरिकेत रॉबिनहूड नावाची ब्रोकरेज फर्म असून, तिच्या मार्फत ऑनलाइन शेअर खेरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. ज्यावेळी कोविडचे निर्बंध लगू होते, त्या काळात या फर्मने लाखो अमेरिकन गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले. ज्या कंपन्यांचा लौकिक फारसा नाही किंवा ज्या कंपन्यांच्या समभागांचे मूल्य आधीच उच्च आहे असे मानले जाते, त्यावर आपले लक्ष्य केंद्रित करण्याचे काम या फर्मने केले. त्यावरून जोखीम पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांना “रॉबिनहूड’ असे संबोधण्यात येते.
भारतातही गेल्या मार्च ते मे या दरम्यान, कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी लाखो गुंतवणूकदारांनी आपली डिमॅट खाती उघडली आणि त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांकडे सामान्यांचा प्रचंड निधी आकर्षित झाला. 2020च्या पहिल्या तिमाहीत रॉबिनहूड गुंतवणूकदारांनी पठडीबाहेरच्या समभागांत गुंतवणूक केली आणि जेव्हा निर्बंध खुले होऊ लागले व विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार भारतात परतू लागले, त्यावेळी उंचावलेल्या शेअर भावांमुळे आपल्याकडच्या गुंतवणूकदांरांचा तुफान फायदा झाला. गेल्या एकदोन वर्षांत ज्या कंपन्यांच्या भावांमध्ये लक्षणीय उतार आला होता, त्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले होते.
रॉबिनहूड गुंतवणूकदारांनीच या खरेदीत मोठा सहभाग घेतला होता, हे उघड आहे.थोडक्यात, भारतात विचारपूर्वक जोखीम घेणाऱ्या रॉबिनहूड गुंतवणूकदारांमध्ये वाढ होत चालली आहे. शेअर खरेदी-विक्रीसाठी येणारा खर्चही कमी झाला आहे. शिवाय ऑनलाइन व्यवहार वाढत असल्यामुळे, टाळेबंदीच्या काळातही समभाग खरेदी-विक्री सुरळीतपणे चालू होती. एप्रिल ते जून या काळात डिमॅट खाती उघडण्याचा सपाटा सुरू होता. त्याच काळात इक्विटी फंडांतून बाहेर पडणाऱ्यांची संख्याही जास्त होती. म्हणजेच म्युच्युअल फंडाच्या मॅनेजरमार्फत व्यवहार करण्याऐवजी, स्वतःहूनच खरेदी-विक्री करण्याकडे कल वाढलेला दिसतो. अशा गुंतवणूकदारांना सेल्फ ट्रेडर्स, असे म्हटले जाते. मात्र याप्रकारच्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांकडे पूर्णतः पाठ फिरवली आहे, असेही नव्हे.
थोडे व्यवहार फंडांमार्फत आणि थोडे स्वतःमार्फत करणे, असे सुरू आहे. काही टेक स्टार्टअप्स “मॉडेल पोर्टफोलिओज’ सुचवतात आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागणारेही लोक आहेत. मात्र स्वतःच स्वतःचे व्यवहार पाहणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांना सर्व प्रकारची काळजी घ्यावी लागते, हे खरेच आहे. इंट्राडे ट्रेडिंग, फ्युचर्स अँड ऑप्शन्स या भानगडीत त्यांनी न पडलेले बरे. शिवाय आपल्या आयुष्यभराच्या बचतीतील काही टक्केच भाग त्यांनी समभाग खरेदी-विक्रीसाठी वापरला पाहिजे.
एकाच प्रकारच्या गुंतवणूक साधनात सर्व पैसा गुंतवणे योग्य नाही. तसेच समाजमाध्यमे किंवा टेलिव्हिजनच्या बिझिनेस चॅनेल्सवरून गुंतवणूक विश्लेषक ज्या समभागांची शिफारस करतात, त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे चुकीचे ठरते. शिफारस केलेल्या कंपन्यांत त्या विश्लेषकांचे काही हितसंबंध तर नाहीत ना, हे बघावे लागते. मुख्य मुद्दा म्हणजे, अर्थव्यवस्था, वेगवेगळी उत्पादनक्षेत्रे, कंपन्या, जागतिक बाजारपेठांचा आपले आपणच अभ्यास करून गुंतवणुकीचा निर्णय घेणे अधिक श्रेयस्कर. अर्थात, त्यामुळे आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्याची संधी मिळत नाही!
एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत 63 लाख नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. गेल्यावर्षी याच कालावधीत फक्त 27 लाख नवीन खाती बनली होती. म्हणजे डिमॅट खाती 130 टक्क्यांनी वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये यंदा 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जेरोधासारख्या दलाली कंपन्यांच्या गुंतवणूकदांरामध्ये टाळेबंदी सुरू झाल्यापासूनच्या काळात दहा लाख नवे गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत.
शेअर बाजारात स्वारस्य असलेल्या अनेकांना कार्यालयात व्यग्र असल्यामुळे शेअर बाजारात लक्ष घालता येत नव्हते. करोनाकाळात मिळालेल्या वेळामुळे लोकांची शेअर बाजारातील रुची वाढली. हे वर्ष संपत आले असून, या पार्श्वभूमीवर, नव्या वर्षाची पहाट आशा अपेक्षाच्या वातावरणात होणार आहे.