शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे परिसरातील केटी बंधारे कोरडेठाक चासकमान धरणाच्या आवर्तनाची प्रतीक्षा
तळेगाव ढमढेरे : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने वेळनदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेती, पशुपालक, कुक्कुटपालन तसेच नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे चासकमान आवर्तनाच्या प्रतीक्षेत येथील शेतकरी आहेत.
शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे परिसरातील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे कोरडेठाक पडले आहेत. या बंधाऱ्यावरून दोन्ही गावे तसेच या गावातील वाड्यावस्त्यांवर पाण्याच्या जलयोजना आहेत. परंतु बंधारेच कोरडे झाल्याने या भागातील पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या असून, नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
शिरूर तालुक्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद (43.6अंश सेल्सिअस) इतकी तळेगाव ढमढेरे या गावाची झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने शिरूरचा पूर्व भाग व पश्चिम भाग यामध्ये पाणीवाटपात दुजाभाव होत असल्याचे नागरिकांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त होत आहे.
उन्हाळ्याचा कालखंड अंतिम टप्प्यात आला असून, शेतकरी व नागरिकांना पाण्याची नितांत गरज आहे. तरी तातडीने पाण्याचे आवर्तन सुरू केल्यास संकटात असलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाची हिरवळ बहरेल.