शिवभोजन योजनेला प्रतिसाद; ऍप्लिकेशनमुळे पारदर्शकता
सातारा – राज्य शासनाच्यावतीने प्रायोगिक तत्त्वावर सातारा शहरात चार ठिकाणी शिवभोजन योजना सुरु झाली असून जिल्हा परिषदेच्या कॅन्टिनमध्ये दुसऱ्या दिवशी सोमवारी शिवभोजन थाळीसाठी रांगा लागल्या होत्या.
शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून ऑनलाइन ऍप्लिकेशनमुळे या योजनेत पारदर्शकतेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषद कार्यालय कॅन्टिनमध्ये पहिल्या दिवशीच या योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलग दुसऱ्या दिवशीही शिवभोजनासाठी याठिकाणी रांगा लागल्या होत्या. सकाळी 11 ते 2 या वेळेत शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. अवघ्या दहा रुपयांत जेवण मिळत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दोन चपाती, भात, लोणचे आणि दोन भाज्या या थाळीत देण्यात येत आहेत.
या योजनेत पारदर्शकता राहावी, यासाठी शासनाने दक्षता घेतली आहे. त्यासाठी ऑनलाइन ऍप्लिकेशन उपयोगी पडत आहे. याशिवाय चांगल्या दर्जाचे जेवण मिळावे यासाठीही लक्ष देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. या नागरिकांना शिवभोजन थाळीचा चांगला फायदा होताना दिसत आहे.