नवी दिल्ली – ब्रिटनच्या उच्चायुक्त जेन मेरियेट यांनी पाकव्याप्त काश्मीरला दिलेल्या भेटीबद्दल भारताने संताप व्यक्त केला आहे. ब्रिटिश उच्चायुक्तांचा हा दौरा आक्षेपार्ह असल्याचे गृहमंत्रलयाने म्हटले असून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही याबाबत निवेदन जारी केले आहे.
भारताच्या सार्वभौमतेचे आणि अखंडतेचे अशा प्रकारचे उल्लंघन करणे पूर्णत: अमान्य आहे असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले असून ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांकडेही याबाबत भारताचा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग असल्याचे ब्रिटनला पुन्हा एकदा स्मरण करून देण्यात आले आहे.
ब्रिटनच्या पाकिस्तानातील उच्चायुक्त जेन मेरियेट यांनी १० जानेवारी रोजी व्याप्त काश्मीरमधील मीरपूर येथे भेट दिली होती आणि त्या भेटीचे फोटो आणि त्याबाबतची पोस्टही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. मीरपूर येथून सलाम, ब्रिटन आणि पाकिस्तानातील लोकांमधील संबंधांचे हृदय. पाकिस्तानी वंशाचे ७० टक्के ब्रिटिश नागरिक हे मीरपूरचे आहेत.
आम्हा सगळ्यांचे एकत्रितपणे काम करणे सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचे असून आदरातिथ्याबद्दल धन्यवाद असे मेरियेट यांनी म्हटले होते. त्यांनी यापूर्वी ८ ऑगस्ट रोजीही एक पोस्ट शेअर केली होती व त्यात आपण कराची, लाहोर आणि इस्लामाबादेतील सर्व राजकीय पक्षांच्या भेटीगाठी घेत असल्याचे सांगतानाच पायाभूत आर्थिक सुधारणा सुरू राहील्या पाहिजेत. तसेच येत्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानात होणाऱ्या निवडणुका त्या देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असल्याचे म्हटले होते.