Rahul Gandhi – भारत जोडो यात्रेमुळे उत्साहित झालेला कॉंग्रेस पक्ष आता भारत जोडो न्याय यात्रेसाठी सज्ज झाला आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्रेच्या त्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रारंभ उद्यापासून (रविवार) मणिपूरमधून होईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा त्या पक्षाचा प्रयत्न असेल.
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मणिपूरच्या थौबलमध्ये यात्रेचा प्रारंभ होईल. एकीकडे भाजपने २२ जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तर, दुसरीकडे कॉंग्रेसनेही यात्रेच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे राजकीय महासंग्राम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच वातावरणनिर्मिती होईल. कॉंग्रेसकडून आपली यात्रा निवडणूक यात्रा नसल्याचे सांगितले जात आहे.
तसे असले तरी, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ती निघणार आहे. यात्रेत बेरोजगारी, महागाई, सामाजिक न्याय या मुद्द्यांवर भर देण्याचे कॉंग्रेसने सूचित केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी तो पक्ष प्रचाराचा अजेंडा निश्चित करण्याच्या दृष्टीने सज्ज झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातून सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठीची पक्षाची रणनीतीही अधोरेखित होत आहे.
जनतेशी निगडीत मुद्दे ऐरणीवर आणण्यासाठी यात्रेचा संकल्प केल्याचे कॉंग्रेसकडून सांगितले जात आहे. ते मुद्दे संसदेत उपस्थित करण्याची संधी केंद्र सरकारने दिली नाही, असे त्या पक्षाचे म्हणणे आहे. यात्रेच्या प्रारंभासाठी करण्यात आलेल्या हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या निवडीतूनही पक्ष संदेश देऊ इच्छित असल्याचे दिसते. यात्रा परिणामकारक आणि परिवर्तनकारी ठरेल, असा विश्वास कॉंग्रेसला वाटत आहे.
भारत जोडो न्याय यात्रा १५ राज्यांमधून ६ हजार ७१३ किलोमीटर प्रवास करेल. बहुतांश प्रवास बसमधून होईल. यात्रेचे काही मार्गक्रमण पायीही असेल. ती यात्रा ११० जिल्हे आणि १०० लोकसभा मतदारसंघांमधून जाईल. यात्रेचा कालावधी ६७ दिवस इतका आहे. यात्रेची सांगता २० किंवा २१ मार्चला मुंबईत होईल. यात्रा सर्वांधिक ११ दिवस उत्तरप्रदेशात असेल.
त्या राज्यातील वाराणसी, अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांमधूनही यात्रा जाणार आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. तर, अमेठी आणि रायबरेली हे प्रदीर्घ काळ गांधी परिवाराचे बालेकिल्ले राहिले. यात्रेदरम्यान राहुल यांची मेळाव्यांमध्ये भाषणे होतील. त्याशिवाय, ते नागरिकांशी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी संवादही साधणार आहेत.