शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; शासकीय विभागांनी झटकली जबाबदारी
म्हसवड – सातारा-पंढरपूर महामार्गावर म्हसवड येथे यश पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या पाझर तलावाचा सांडवा काही माथेफिरूंनी शनिवारी दुपारी फोडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. याप्रकरणी तलाठी अखडमल यांच्याकडे तक्रार केली असता, या तलावाशी आपला काहीही संबंध नाही, असे म्हणून त्यांनी घटनास्थळी भेटही दिली नाही. त्यामुळे तलावाचा सांडवा फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन कामात टाळाटाळ करणाऱ्या तलाठ्याची चौकशी व्हावी, अशा मागणीचे निवेदन परिसरातील शेतकऱ्यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिले आहे. कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, सातारा-पंढरपूर रस्त्यालगत यश पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या तलावाचा सांडवा काही माथेफिरूंनी शनिवारी दुपारी फोडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. हे पाणी लगतच्या शेतात घुसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा सांडवा फोडणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला; परंतु त्यांना न जुमानता तलावाचा सांडवा फोडण्यात आला. हा तलाव 1972 च्या दुष्काळात बांधण्यात आला असून तेथील पाणीसाठ्यावर पवार वस्ती, पंत वस्ती, शेंबडे वस्ती, माने वस्तीतील 500 एकर शेती ओलीताखाली येते. गुरे, ढोरे, मेंढरे या तलावातील पाणी पितात. एकीकडे माण तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी श्रमदानातून जलसंधारण केले जात असताना दुसरीकडे तलाव फोडण्याचे प्रकार होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतोय आमचा काही संबंध नाही
तलावातील पाणी जवळ जवळ 18 तास वाया जात असल्याची माहिती देऊनही तलाठी अखडमल यांनी जबाबदारी टाळली. मात्र, तलावातील माती उपसणाऱ्यांवर कारवाई करण्यात महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी तत्परता दाखवतात. मात्र, लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची माहिती देण्यासाठी संपर्क साधला असता, प्रांताधिकाऱ्यांनी फोनच उचलला नाही. तहसीलदार बाई माने यांनी पाटबंधारे विभागात संपर्क साधला असता खाडे नामक अधिकाऱ्याने या विभागाचा त्याच्याशी काही संबंध नाही, असे म्हणून जबाबदारी टाळली.