Arvind Kejriwal – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी कथित दारू घोटाळ्यातील आरोपांमुळे तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) तपास करण्याची शिफारस केली आहे. असे सांगण्यात येत आहे की, राजभवनाकडे एक तक्रार आली होती, ज्यामध्ये केजरीवालांवर खलिस्तानी दहशतवादी संघटनेकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. केजरीवाल यांनी शिख फॉर जस्टिस (SFJ) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेकडून पैसे घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने देवेंद्र पाल भुल्लरच्या सुटकेसाठी अतिरेकी खलिस्तानी गटांकडून $16 दशलक्ष डॉलर्सचा निधी घेतल्याची तक्रार सक्सेना यांना मिळाल्याचे लेफ्टनंट गव्हर्नर सचिवालयाने केंद्रीय गृह सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तक्रारदाराने दिलेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्याची फॉरेन्सिक तपासणी आणि संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची गरज असल्याचे राजभवनच्या वतीने सांगण्यात आले. केजरीवाल यांना21 मार्च रोजी कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
नुकताच पन्नू यांनी केला होता दावा –
अलीकडेच खलिस्तानी दहशतवादी पन्नू यानेही एक व्हिडिओ जारी करून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. पन्नू यांनी दावा केला होता की त्याच्या संस्थेने 2014 ते 2022 दरम्यान आम आदमी पार्टीला $16 दशलक्ष (सुमारे 134 कोटी रुपये) दिले. दहशतवादी देवेंद्र पाल भुल्लरच्या सुटकेचे आश्वासन देऊन आम आदमी पक्षाने पैसे घेतल्याचा दावाही पन्नू यांनी केला होता. ते म्हणाले की, केजरीवाल यांनी पैसे घेऊन आश्वासने पूर्ण केली नाहीत.
कुमार विश्वास यांनीही आरोप केले होते –
यापूर्वी आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावर खलिस्तान समर्थक संघटनांशी हातमिळवणीचा आरोप केला होता. आपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या कुमार विश्वास यांनी सांगितले होते की, त्यांनी केजरीवाल यांना खलिस्तान समर्थकांची बैठक घेताना पाहिले होते आणि त्यांनी आक्षेपही व्यक्त केला होता.
आम आदमी पक्षाकडून कट रचल्याचा दावा –
केजरीवाल यांच्याविरोधातील नव्या तपासावर आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा भाजपवर कट रचल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील संभाव्य पराभव पाहून भाजपने नवे षड्यंत्र रचल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. केजरीवाल सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही चौकशीची शिफारस करणारे एलजी व्हीके सक्सेना यांच्याविरोधात कठोर शब्द वापरले आणि त्यांना भाजपचे एजंट म्हटले. भारद्वाज म्हणाले की, भाजपच्या इशाऱ्यावर सीएम केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक कट रचला गेला आहे. दिल्लीतील सातही जागा भाजप गमावत असून पराभवाच्या भीतीने भाजप दहशतीत असल्याचे ते म्हणाले. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने हा कट रचल्याचे मंत्री भारद्वाज म्हणाले.