नवी दिल्ली – तिहार तुरुंग प्रशासनाने तुरूंगाच्या ५० कर्मचार्यांना त्यांच्या बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन रेकॉर्डमध्ये विसंगती आढळल्यानंतर कामावरून काढून टाकण्याची नोटीस जारी केली आहे. या ५० निलंबित कर्मचार्यांमध्ये ३९ वॉर्डन, ९ सहाय्यक अधीक्षक आणि २ मॅट्रॉन आहेत.
दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डच्या निर्देशानुसार ही ४५० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या ४५० कर्मचाऱ्यांपैकी ५० कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक ओळख जुळली नाही, त्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांनी भरती परिक्षेत दुसऱ्याच कोणाला तरी डमी उमेदवार म्हणून बसवले होते. त्यामुळेच त्यांचे बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन जुळले नसावे असा कयास आहे. त्यांची अलिकडेच नियुक्ती झाली होती. हे सर्व कर्मचारी दोन वर्षांच्या प्रोबेशन कालावधीवर होते, अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना नोटीसवर एका महिन्याच्या आत उत्तर द्यावे लागेल.