मंचर – पुणे येथे मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन अन् चर्चा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची. यामुळे राजकीय निरीक्षकाच्या भुवया उंचवल्या असून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी (दि. 1) पुणे दौऱ्यावर होते. त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तसेच त्यांच्या हस्ते मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, पुरस्कारावेळी अनेक गोष्टी व्यासपीठावर घडत होत्या. मात्र, त्यात विशेष चर्चा होऊ लागली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या चर्चेची. नरेंद्र मोदी यांनी वळसे पाटील यांना पाच मिनिटे बोलवून घेत चर्चा केली, त्यामुळे या भेटीची चर्चा आता होऊ लागली आहे.
पुण्यातील शिवाजीनगर येथे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
अजित पवार आणि वळसे पाटील हे भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी वळसे पाटील यांनास्वतः बोलावून घेतले आणि त्यांच्याशी जवळपास पाच मिनिटे चर्चा केली. यात दोघांची नेमकी काय चर्चा झाली, हे समजले नाही. मात्र, त्यानंतर वळसे पाटील पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याजवळ जाऊन बसले आणि त्यांनी एक फोन केला आणि तो अजित पवार यांच्याकडे दिला. त्यांनी समोरच्या व्यक्तीशी संवादही साधला आणि दिलीप वळसे पाटील हे उच्च कायदे अभ्यासक म्हणून परिचित आहेत.
आता त्यांच्याकडे सहकार खाते आहे, त्यामुळे नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच्या वेळी ही चर्चा सुरू होती. यावेळी वळसे पाटील यांच्या शेजारी अजित पवार देखील उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर देखील वळसे पाटील हे राज्यपाल रमेश बैस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच होते. राज्याचे राजकारण सध्या अनेक घोडामोडींनी व्यापले आहे, त्यात आता पंतप्रधान आणि वळसे पाटील यांच्यातील चर्चा देखील चर्चेत आली आहे.