– हिमांशू
मोठी माणसं मोठी का असतात? आणि मोठं बनण्याच्या स्वप्नामागे सैरावैरा धावणारी माणसं कायम छोटी का राहतात? याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे, “मोठं होणं’ म्हणजे काय हे अनेकांना समजत नाही. अर्थात, तो त्यांचा दोष नसतो. पत, पैसा, प्रतिष्ठा या “पी-थ्री’च्या पलीकडे जाऊन मोठेपणाचा विचार कुणी करतच नाही. लौकिकार्थाने मोठं होण्यासाठी एखाद्याने वाममार्ग वापरलाय, हे ठाऊक असूनसुद्धा पोळ्याला मधमाशा चिकटाव्यात तशी माणसं त्याला चिकटतात आणि सरळमार्गी माणसाकडे “पी-थ्री’ नसेल तर त्याच्याकडे कुणी ढुंकूनही पाहात नाही. दुसरं कारण असं, की आपण बहुधा स्वतःशीच प्रामाणिक नसतो.
जगाचं सोडा, आपण एखादी चुकीची गोष्ट करीत असलो तर ते किमान आपल्याला तरी माहीत आणि मान्य असायला हवं. चूक सुधारण्याच्या तीन पायऱ्या आहेत. पहिली, चूक समजणं. दुसरी, ती मान्य करणं आणि तिसरी पायरी चूक सुधारणं. आपण बहुतांश वेळा पहिल्या दोन पायऱ्यांवर अडखळतो. या पार्श्वभूमीवर, ज्याला लोक “देव’ मानतात अशा उत्तुंग लोकप्रियता लाभलेल्या माणसानं “माझी चूक झाली,’ हे चारचौघात मान्य केलं, तर तो आणखी मोठा ठरतो. दाक्षिणात्य मेगास्टार, सर्वांचा लाडका थलैवा रजनीकांत वयाच्या 82 व्या वर्षी “माझी चूक झाली,’ असं म्हणतो, तेव्हा त्याच्या चाहत्यांनी त्याच्याकडे केवळ लोकप्रिय अभिनेता म्हणून नव्हे तर एक शिक्षक म्हणून पाहिलं पाहिजे.
लाखो लोक ज्याच्यावरून जीव ओवाळून टाकतात, ज्याच्या चित्रपटांचा प्रीमिअर भल्या पहाटे त्याच्या भव्य पोस्टरला दुग्धाभिषेक घालून होतो, त्या थलैवाने नव्या चित्रपटाच्या म्युझिक लॉंचिंग कार्यक्रमात असं सांगितलं, की दारू पिणं ही आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती. आपण दारूच्या नशेत घरी कसे आलो होतो, आपल्या भावाने आपल्याला कोणत्या शब्दांत समजावून सांगितलं, याची माहिती खरं तर वयाच्या आणि लोकप्रियतेच्या या टप्प्यावर पोहोचल्यानंतर देण्याची रजनीकांत यांना काय गरज होती? परंतु अभिनेता बनण्यापूर्वी त्यांनी बस कंडक्टर म्हणून काम केलं होतं, ते दिवस अजून त्यांच्या स्मरणात आहेत.
त्या काळात आपण दररोज मद्यपान, धूम्रपान आणि मांसाहार करीत होतो, हे त्यांना अजून आठवतं. एवढंच नव्हे तर प्रचंड लोकप्रियता मिळवूनसुद्धा त्यांना या गोष्टींबद्दल आजही खेद वाटतो. आपण ही व्यसनं केली नसती, तर समाजाची आणखी सेवा करू शकलो असतो, असं त्यांनी बोलून दाखवलं. उपस्थितांना सल्ला देताना ते म्हणाले, “मद्यपान पूर्णपणे टाळा असं मला म्हणायचं नाहीये; पण आनंदात असाल तरच मद्यपान करा. अन्यथा आरोग्य आणि आनंद गायब होईल.’
व्यसन करणाऱ्या प्रत्येकाचं काही ना काही म्हणणं असतंच. कुणी आनंद वाढवण्यासाठी तर कुणी दुःख कमी करण्यासाठी मद्यपान करतो; परंतु नेमकं उलटं घडतं. मद्यपानामुळे आनंद कमी होतो आणि दुःख वाढत जातं. शिवाय, “मला व्यसन नाही, फक्त गंमत म्हणून कधीतरी…’ वगैरे स्पष्टीकरणं तयार असतातच. सत्यापासून पळून जाण्याच्या या वृत्तीतूनच नकारात्मकता वाढत जाते आणि मग संबंधित व्यक्ती मद्याला कधीच नकार देऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर 82 वर्षांच्या थलैवाचा प्रामाणिकपणा भावतो.