शिक्षण विभाग अधिकाऱ्यांनाही धास्ती
विनापरवानगी मुख्यालयात गैरहजेरी भोवणार
पुणे – लॉकडाऊन काळात शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी विनापरवानगी मुख्यालय सोडून गावी गेले आहेत. या काळात मुख्यालयात गैरहजर राहिलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. यामुळे सर्वांनाच धडकी भरली आहे.
करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात लॉकडाऊनच्या काळात मर्यादित संख्येत अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यालयीन कामकाज सुरू ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, शालेय शिक्षण विभागाच्या काही कार्यालयात अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहिल्याचे उघड झाले आहे. पूर्वपरवानगी न घेता बरेच जण आपआपल्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे कार्यालय उपस्थित असलेल्या इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा अनावश्यक ताण येत आहे.
वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी 5 जून रोजी कार्यालयातील उपस्थितीबाबत नवीन आदेश लागू केले आहेत. त्याप्रमाणे दक्षता घ्यावी, अशा सूचनाही शिक्षण आयुक्तांनी विविध कार्यालय प्रमुखांना दिलेल्या आहेत.
सहा बड्या विभागांना बजाविले आदेश
शिक्षण विभागात विविध प्रकरणांच्या फाइल्स “पेन्डिंग’ आहेत. याची शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. मुख्यालय सोडून परस्पर गावी निघून गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहितीही त्यांनी मागवली आहे. संबंधितांवर नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करा, असे आदेशही शिक्षण आयुक्तांनी प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक यांना दिले आहेत.